भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात जमैका येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. वेस्ट इंडिजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिल्यानंतर, भारताने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमानांच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात यश मिळवलं आहे. दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी १-१ बळी घेत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. इशांत शर्माने क्रेग ब्रेथवेटला यष्टीरक्षक पंतकडे झेल द्यायला भाग पाडत विंडीजला पहिला धक्का दिला. या बळीसह इशांत शर्मा, कसोटी क्रिकेटमध्ये आशिया खंडाबाहेर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

इशांतने माजी कर्णधार कपिल देव आणि जलदगती गोलंदाज झहीर खान यांचा विक्रम मोडीत काढला. सध्या या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि फिरकीपटू अनिल कुंबळे २०० बळींसह पहिल्या स्थानावर आहे.

हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला अजुनही ४२३ धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळात विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.