३१ जुलै (रविवार) बर्मिंगघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी २० सामना रंगला. एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा गडी राखून पराभव केला. भारताची सलामीवीर स्मृती मंधाना धमाकेदार अर्धशतकीय खेळी करून भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. स्मृती मैदानावरती असताना अनेकांना तिला बघून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण झाली.

पावसामुळे सामन्याला काही काळ उशीर झाला. त्यामुळे प्रत्येकी १८ षटकांचा खेळ घेण्यात आला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १८ षटकात १०० धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य दोन गड्यांच्या बदल्यात ११.४ षटकांमध्येच पूर्ण केले. भारताच्या सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने डावाची आक्रमक सुरुवात केली. स्मृती मंधानाने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिने ४२ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६३ धावांची नाबाद खेळी केली. स्मृतीने आपले अर्धशतक एक उत्तुंग षटकार ठोकून पूर्ण केले.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असला की, दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. मात्र, स्मृतीने हा दबाव सक्षमपणे सांभाळला. १२ व्या षटकामध्ये स्मृतीने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी अनेकांना तिच्यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची झलक दिसली. धोनीने २०११ विश्वचषकातील अंतिम सामन्यात असाच षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

हेही वाचा – Commonwealth Games 2022 : सुवर्णपदक विजेत्या मीराबाईच्या घरी झाला ‘असा’ जल्लोष; बघा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृतीचे हे आपल्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील १५वे अर्धशतक ठरले. याशिवाय पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि टी २० सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.