वृत्तसंस्था, हैदराबाद

IND vs ENG test match फिरकीपटूंच्या प्रभावी माऱ्यानंतर मुंबईकर सलामीवीर यशस्वी जैस्वालने (७० चेंडूंत नाबाद ७६) साकारलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर भारताने गुरुवारपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. इंग्लंडला २४६ धावांवर रोखल्यानंतर भारताने दिवसअखेर १ बाद ११९ धावा केल्या होत्या.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ‘बॅझबॉल’ या अति-आक्रमक प्रवृत्तीने खेळणारे इंग्लंडचे फलंदाज विरुद्ध भारतीय फिरकी गोलंदाज या द्वंद्वाकडे सर्व चाहत्यांचे लक्ष होते. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या दिवशी तरी भारतीय फिरकी गोलंदाजच वरचढ ठरले. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचे प्रत्येकी तीन बळी, तर अक्षर पटेलचे दोन बळी यामुळे भारताने इंग्लंडला २४६ धावांतच गुंडाळले. याच्या प्रत्युत्तरात ‘बॅझबॉल’कडून प्रेरणा घेत यशस्वीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पावित्रा अवलंबला. डावखुऱ्या यशस्वीने ७० चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी दबदबा निर्माण करण्यात यश आले.

हेही वाचा >>>U19 World Cup : मुंबईकर मुशीर खानचा शतकी तडाखा; भारताचा आयर्लंडवर दणदणीत विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वीला कर्णधार रोहित शर्माची उत्तम साथ लाभली. या दोघांनी १२.२ षटकांतच ८० धावांची सलामी दिली. विशेषत: यशस्वीने इंग्लंडचा पदार्पणवीर टॉम हार्टलीला लक्ष्य केले. इंग्लंडच्या संघात मार्क वूडच्या रूपात एकच वेगवान गोलंदाज असल्याने डावखुरा फिरकीपटू असलेल्या हार्टलीला नव्या चेंडूने गोलंदाजी करावी लागली. यशस्वीने ४७ चेंडूंतच आपले अर्धशतक झळकावले. रोहितने तीन चौकारांसह २७ चेंडूंत २४ धावा केल्या. मात्र, अनुभवी डावखुरा फिरकीपटू जॅक लिचच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. दिवसअखेर यशस्वीच्या साथीने शुभमन गिल (४३ चेंडूंत नाबाद १४) खेळपट्टीवर होता.