पीटीआय, हांगझो (चीन)

भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात यजमान चीनकडून १-५ अशा निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. चीनसाठी ताओ कियांगलोंग (७२व्या मिनिटाला व ७५ व्या मि.) यांनी दोन गोल झळकावले. तर, गियाओ तियानयी (१७व्या मि.), डेई वेइजुन (५१व्या मि.) व हाओ फेंग यांनी प्रत्येक एक गोल झळकावत साथ दिली. तयारीशिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून एकमेव गोल राहुल केपीने पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत केला.

भारतीय संघाने सामन्यातील सुरुवातीचे ४५ मिनिटे जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या चीनला आव्हान दिले. भारतीय गुरमीत सिंग चहलने यादरम्यान चमकदार कामगिरी करताना चीनचा कर्णधार झू चेनजीच्या पेनल्टी किकला रोखले. पुढच्या फेरीत आगेकूच करण्यासाठी भारताला आता उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताचा सामना बांगलादेश व म्यानमार यांच्याशी होणार आहे. भारताकडे चांगला आघाडीपटू नाही, तसेच बचावफळीमध्ये समन्वयाचा अभावही दिसून आला. संघ थकलेला दिसत होता आणि त्यांच्याकडून अपेक्षाही फारशा नव्हत्या. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये फरक पाहायला मिळाला.

हेही वाचा >>>IND vs AUS: “ते जे आहे ते आहे !! मी पुढे…”; टीम इंडियातून पुन्हा वगळल्याने संजू सॅमसनची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दमट वातावरण व सरावाच्या अभावामुळे सुरुवातीच्या अध्र्या तासातच भारतीय संघ थकलेला जाणवला व त्यांच्याकडे चिनी खेळाडूंच्या आक्रमणाचे उत्तर नव्हते. संदेश झिंगन याच्या चुकीमुळे दुसरा गोल होऊनही चीनने नंतर तीन आणखी गोल केले. कर्णधार सुनील छेत्री ८५ मिनिटांपर्यंत मैदानात राहिला. मात्र, त्याला सहकाऱ्यांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. भारतासाठी राहुल केपीने चांगली कामगिरी केली. १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या राहुलने संघासाठी निर्णायक गोल केला. त्यापूर्वी, गियाओने संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे मध्यांतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा विजय

भारताच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने कंबोडियावर ३-० असा विजय मिळवला. ‘क’ गटातील सामन्यात भारताने कमी क्रमवारी असलेल्या कंबोडियाला २५-१४, २५-१३, २५-१९ असे पराभूत केले. बुधवारी भारताचा सामना जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाशी होणार आहे.