India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम केल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्यातील पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५० धावा करायच्या आहेत. दरम्यान पाचव्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.
पाचव्या दिवशी पाऊस पडणार?
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, लीड्समध्ये सकाळ आणि दुपारच्या सत्रात पाऊस हजेरी लावू शकतो. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३०) पाऊस पडू शकतो, असा अंदाव वर्तवण्यात आला आहे.पाऊस आल्यानंतर ऊन पडेल आणि पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी असेल.
भारतीय संघ हा सामना जिंकून इतिहास रचण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ साखळीतील भारतीय संघाचा पहिला सामना आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ या साखळीत विजयाने सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडला हा सामना जिंकायचा असेल, तर इतिहास घडवावा लागणार आहे. कारण याआधी कसोटी क्रिकेटमध्ये केवळ एकदाच शेवटच्या दिवशी ३५० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला आहे.
भारतीय संघाने ठेवलं ३७१ धावांचं आव्हान
भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ४६५ धावा करता आल्या. पहिल्या डावात भारतीय संघाने ६ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाकडून केएल राहुल आणि ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. पहिल्या डावात शतकी खेळी करणारे यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या डावात स्वस्तात माघारी परतले. तर केएल राहुलने १३७ आणि ऋषभ पंतने ११८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३६४ धवा केल्या. यासह भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं.