भारत आणि न्यूझीलंडमध्ये २५ नोव्हेंबर रोजी मालिकेतला पुढचा सामना होणार आहे. उत्तरप्रदेशातल्या कानपूर इथं या दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतील. ही टेस्ट सीरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असेल. कानपूरात होणाऱ्या या पहिल्या टेस्ट मॅचबद्दल न्यूझीलंडच्या संघाच्या प्रशिक्षकांनी आपल्या संघाच्या रणनीतीबद्दल खुलासा केला आहे. न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी हे संकेत दिले आहेत की त्यांचा संघ पहिल्या सामन्यात तीन स्पिनर्सला मैदानात उतरवेल. कोच गॅरी यांनी हेही सांगितलं की भारतात येऊन कोणत्याही संघाला जिंकणं अवघड असतं. पण इथं चार फास्ट बॉलर्स, एक स्पिनर यांना खेळवणं अवघड आहे. भारतातली मैदानं स्पिनर्ससाठी पूरक आहेत. म्हणूनच विदेशी संघांना इथं जिंकणं आव्हानात्मक असतं. मात्र जर न्यूझीलंड तीन स्पिनर्ससोबत खेळात उतरले तर मैदानाच्या परिस्थितीचा फायदा संघाला होईल. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, तुम्ही आमच्या तीन स्पिनर्सला खेळताना पाहू शकता. पण तरीही एकदा मैदान पाहून निर्णय घेतला जाईल. आम्हाला परिस्थितीनुसार आमचा निर्णय बदलावा लागेल. गॅरी यांचं मत आहे की मुंबई आणि कानपूर दोन्हीकडची माती वेगळी आहे. मुंबईतली माती थोडी लाल आहे मात्र कानपूरमध्ये पूर्णतः काळी माती आहे. अशा परिस्थितीत जुळवून घेणं बरंच अवघड असणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण दोन टेस्ट मॅच खेळल्या जातील. पहिला सामना कानपूरमध्ये २५ नोव्हेंबरला होईल. तर दुसरा सामना ३ डिसेंबरपासून सुरू होईल. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचं कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे असेल तर दुसऱ्या सामन्यात कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहली सांभाळेल.