वंदनाची चमकदार कामगिरी

क्वालालम्पूर : आक्रमक वंदना कटारियाने झळकावलेल्या दोन गोलच्या बळावर भारताने पहिल्या लढतीत मलेशियाचा ३-० असा पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. वंदनाने १७व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल साकारले, तर लालरेमसियामीने ३८व्या मिनिटाला एक गोल केला.

मलेशियाने अप्रतिम सुरुवात केली. तिसऱ्याच मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु अनुभवी सविता पुनियाने अप्रतिम गोलरक्षण केले. लालरेमसियामीने पाचव्या मिनिटाला गोल करण्याचा कसोशीने प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. दोन मिनिटांनी नवनीत कौलचा प्रयत्न मलेशियाच्या गोलरक्षकाने हाणून पाडला.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपल्यानंतर १७व्या मिनिटाला वंदनाने शानदार मैदानी गोलसह ही कोंडी फोडली. भारताच्या बचाव फळीने मलेशियाच्या आक्रमणावर दडपण ठेवले. त्यांना मिळालेल्या तिन्ही पेनल्टी कॉर्नरच्या संधी वाया गेल्या.

तिसऱ्या सत्रात युवा लालरेमसियामीने मैदानी गोल साकारत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. मग चौथ्या सत्रात सामना संपण्याची शिटी वाजण्याआधी काही सेकंद वंदनाने तिसरा गोल झळकावला. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी होणार आहे.