IPL 2019 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दरम्यान झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या संदर्भात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने चिंता व्यक्त केली.

आम्ही सामना जिंकलो एवढेच मला समजले होते. त्यानंतर मला कोणीतरी सांगितले की तो नो बॉल होता. अशा पद्धतीच्या चुका या क्रिकेटच्या खेळासाठी चांगल्या नाहीत, इतकेच मी म्हणेन. त्या आधीच्या षटकात बुमराहने टाकलेला चेंडू हा वाईड नव्हता, पण तो पंचांनी वाईड घोषित केला. अशा निर्णयांनी काही वेळा सामन्याला कलाटणी मिळते. सामन्याची दिशा बदलते, असे रोहित म्हणाला.

मैदानावरील पंचांसह आपल्याकडे टीव्ही पंचांची मदत घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यांनी काय घडलं ते पहिले पाहिजे. अशा गोष्टींबाबत खेळाडू फारसे काही करू शकत नाहीत. सामना संपल्यावर खिलाडूवृत्तीने मैदानाबाहेर जाणे आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंना हस्तांदोलन करणे इतकेच खेळाडूंच्या हातात होते कारण तो शेवटचा चेंडू होता. पण ही बाब थोडीशी खेदजनक आहे. यापुढे पंच आणि इतर मंडळी अशा चुका दुरुस्त करतील अशी अपेक्षा रोहित शर्माने व्यक्त केली.

शेवटच्या षटकात बंगळुरूला सहा चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाच्या या षटकामध्ये पहिल्या पाच चेंडूत बंगळुरुला १० धावा काढण्यात यश मिळाले. त्यामुळे विजयासाठी शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज होती. जर फलंदाजाने षटकार मारला असता, तरी सामना अर्णिर्नित राहून त्याचा निकाल सुपर ओव्हरच्या माध्यमातून लागला असता. पण अखेरच्या चेंडूवर बंगळूरच्या फलंदाजांना एकच धाव घेता आली आणि मुंबईच्या खेळाडूंनी जल्लोष सुरु केला. या गोंधळामध्ये मलिंगाने टाकलेला शेवटचा चेंडू हा नो बॉल होता, याकडे पंचांचे लक्ष गेले नाही. ही चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे पंचाचा निर्णय अंतिम सांगत मुंबईने सामना जिंकल्याचे जाहीर करण्यात आले.

दरम्यान, बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर ६ धावांनी मात केली. बाराव्या हंगामातला मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र जसप्रीत बुमराहने १९ व्या षटकात भेदक मारा करत बंगळुरुचं आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या १८ धावा पूर्ण करत बंगळुरुला जमलं नाही. बुमराहने आजच्या सामन्यात ३ बळी घेतले. लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती. मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. एबी डिव्हीलियर्सने ७० धावांची खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली.

त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं.पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंह यांनी फटकेबाजी करत रोहित शर्माला चांगली साथ दिली. यामुळे मुंबईने आश्वासक धावसंख्या गाठली. मात्र मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकललं. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात पुरती निराशा केली. कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज आज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडलं. त्याने ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.