मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा आठ गडी आणि ७० चेंडू राखून अक्षरश: फडशा पाडला. या वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम असून मुंबईने या विजयाच्या जोरावर गुणतालिकेमध्ये सातवरुन थेट पाचव्या स्थानी उडी मारली आहे. मुंबईच्या या विजयामुळे चौथ्या स्थानावर कोणता संघ राहणार याची चुरस आणखीन वाढलीय. पाहूयात कोणत्या संघांना कशाप्रकारे प्लेऑफचं तिकीट निश्चित करता येणार आहे.
नक्की वाचा >> धोनीने केली IPL मधील निवृत्तीसंदर्भातील घोषणा; म्हणाला, “मी अखेरचा सामना…”
केकेआर
> सध्या तरी गुणतालिकेमध्ये केकेआर मुंबईपेक्षा सरस कामगिरीच्या जोरावर चौथं स्थान पटकावण्याच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहे.
> राजस्थानविरोधातील त्यांचा लीग स्टेजमधील अंतिम सामना ते जिंकले आणि सनरायझर्स हैदराबादने मुंबईला पराभूत केलं तर केकेआर प्लेऑफ मध्ये जाणारा चौथा संघ ठरेल.
> तसेच केकेआरला आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही पण सनरायझर्सने मुंबईला पराभूत केलं तरी चौथ्या आणि पाचव्या स्थानावरील संघांचे गुण समान राहतील.
> गोंधळ इथेच संपत नाही तर सीएसके आणि पंजाब सामन्याच्या निकालावर किती संघाचे समान गुण असणार हे निश्चित होईल.
> राजस्थानने सामना जिंकला आणि चेन्नईने पंजाबला पराभूत केलं तर समान गुण असणारे तीन संघ होतील केकेआर, मुंबई आणि राजस्थान.
> मात्र पंजाबने चेन्नईला पराभूत केलं तर त्यांचेही १२ गुण होतील आणि १२ गुण असणाऱ्या संघांची संख्या तीनवरुन चारवर जाईल.
> केकेआरसाठी चांगली बातमी ही आहे की सध्या चौथ्या स्थानासाठी झगडणाऱ्या चार संघांमध्ये त्याचं नेट रनरेट सर्वात उत्तम आहे. त्यामुळेच चारही संघाचे गुण समान असतील तर केकेआर प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.
मुंबई
> मुंबईने त्यांच्या अंतिम सामन्यात हैदराबादला पराभूत केलं तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केकेआरला शेवटचा सामना जिंकावाच लागेल.
> मुंबई सध्या पाचव्या स्थानी आहे. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत ते केकेआरपेक्षा फारच मागे आहेत. दोन्ही संघांमधील नेट रनरेटचं अंतर फारच जास्त असल्याने त्यांना केकेआरच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.
> एका अंदाजानुसार सध्या केकेआर आणि मुंबईमधील नेट रनरेटचं अंतर भरुन काढण्यासाठी मुंबईला हैदराबादविरुद्धचा सामना ११ षटकं शिल्लक असतानाच किंवा ९० हून अधिक धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
> अर्थात स्वत:चा शेवटचा सामना जास्तीत जास्त मोठ्या फरकाने जिंकण्यासोबतच त्यांना राजस्थान केकेआरला पराभूत करेल यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. असं झालं तरच मुंबईला प्लेऑफमध्ये खेळता येईल.
> मात्र केकेआरने त्यांचा अंतिम सामना जिंकला तर मुंबई आणि केकेआरचे गुण समान होतील पण नेट रनरेटच्या जोरावर केकेआर प्लेऑफमध्ये जाईल.
पंजाब
> सध्या पंजाबचा संघ सहाव्या स्थानी आहे. मात्र चारही संघाचे १२ गुण झाल्यास पंजाबला संधी आहे.
> मुंबईला हैदराबादने पराभूत केलं आणि केकेआरचा संघ राजस्थानकडून पराभूत झाला तर पंजाबची लॉटरी लागू शकते.
> मात्र असं झालं तरी केकेआरचा मोठा पराभव होणं आवश्यक आहे तरच नेट रनरेटच्या जोरावर पंजाब अंतिम चारमध्ये पोहचेल.

राजस्थान
> राजस्थानलाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केकेआरविरुद्धचा त्यांचा अंतिम सामना जिंकणं आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर त्यांना मुंबईचा पराभव होणेही गरजेचे असणार आहे.
> राजस्थानचा नेट रनरेट हा पंजाब आणि मुंबईपेक्षाही वाईट आहे. त्यामुळेच केवळ समान गुण असून राजस्थानला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.