आयपीएल २०२१च्या ३५व्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) सहज पराभव केला. सामन्यापूर्वी विराट आणि धोनी मैदानावर एकमेकांशी कशा पद्धतीने वागले, हे सर्वांनीच पाहिले. विराट आणि धोनी यांच्यात एक चांगले बंधन असल्याचे सर्वजण जाणतात. मात्र सामना गमावल्यानंतरही विराटने धोनीबाबत असे कृत्य केले, जे पाहून चाहत्यांनाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.

हेही वाचा – चेन्नईच्या मराठमोळ्या फलंदाजाचा विराटनं घेतला जबरदस्त कॅच; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, WOW..!

आयपीएल २०२१च्या उत्तरार्धात आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव होता. पराभव आणि निराशा असूनही विराट आपल्या माजी कर्णधाराला मिठी मारण्यापासून रोखू शकला नाही. सामना संपल्यानंतर धोनी सहकाऱ्यांशी चर्चा करत होता, तेव्हा विराटने पाठून येत त्याला मिठी मारली. त्यांच्या मैत्रीच्या बंधनाचे हे दृश्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. चाहत्यांनीही या फोटोला ‘ब्रोमान्स’ असे म्हटले.

विराट कोहलीसाठी मागील काही कालावधी वैयक्तिकदृष्ट्या म्हणावा तसा चांगला राहिलेला नाही. एक कर्णधार म्हणून तो अपयशी ठरत असल्यावरून चर्चा रंगत आहेत. याच कारणामुळे त्याने काही दिवसांपूर्वी भारताच्या टी-२० संघाचे आणि आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

असा रंगला चेन्नई-बंगळुरू सामना

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ गड्यांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दमदार सुरुवात केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या पाच षटकात विकेट्स गमावत चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी १५७ धावांचे आव्हान दिले आहे. वाळूच्या वादळामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नाणेफेकीलाचा कौल धोनीच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या छोट्या मैदानावर प्रेक्षकांना चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती.

विराट-देवदत्तने अर्धशतकी खेळ्या करत १११ धावांची दमदार सलामीही दिली. पण हे दोघे माघारी परतल्यानंतर आरसीबीचे उर्वरित स्टार फलंदाज मोठे फटके खेळू शकले नाहीत. चेन्नईने शेवटच्या पाच षटकात त्यांना केवळ २५ धावा दिल्या. त्यामुळे उत्तम सुरुनवातीनंतरही त्यांनी चेन्नईसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात चेन्नईने अर्धशतकी सलामी आणि मधल्या फळीतील महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळे बंगळरूच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. बंगळुरूच्या धावसंख्येला लगाम घालणाऱ्या चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होला सामनावीर पुरस्कार मिळाला.