आयपील २०२१ स्पर्धेत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला नमवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात शेवटच्या क्षणी रंगतदार परिस्थिती निर्माण झाली. हातातोंडाशी आलेला विजयी घास कोलकाताकडून दिल्ली हिरावणार का असे सर्वांना वाटत होते, पण फलंदाज राहुल त्रिपाठीने कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतर भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने ट्वीट केले आहे.

युवीने आपल्या ट्वीटमध्ये या सामन्यासोबत क्रिकेटबद्दलचे मत मांडले आहे. तो म्हणाला, ”मला क्रिकेट आवडत नाही, तर माझे क्रिकेटवर प्रेम आहे. काय हा खेळ आहे. कोलकाताचे अभिनंदन. ऋषभ पंत आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी मला वाईट वाटत आहे, पण हा एक खेळ आहे. यात फक्त एकच विजेता असू शकतो.”

या पराभवामुळे दिल्लीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. मागील वर्षी त्यांनी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अंतिम फेरीत धडक दिली होती, पण मुंबईकडून त्यांना पराभव पाहायला मिळाला.

हेही वाचा – T20 World Cup: “आम्ही सलामीचा सामना जिंकणारच”, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला डिवचलं

असा रंगला सामना

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२१च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर रंगलेल्या या रंगतदार सामन्यात कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा परिणाम आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला २० षटकात ५ बाद १३५ धावा करता आल्या. प्रत्त्युत्तरात सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशादायक कामगिरी करत थोडी धाकधूक वाढवली. २ चेंडूत ६ धावांची गरज असताना भरवशाचा फलंदाज राहुल त्रिपाठीने षटकार ठोकत कोलकाताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या व्यंकटेश अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आयपीएल २०२१चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात १५ ऑक्टोबरला रंगणार आहे.