IPL 2025 Tickets, MI vs DC: आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना येत्या १७ मे पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील ५८ सामने झाल्यानंतर ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता बीसीसीआयने सुधारीत वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना १७ मे पासून सुरूवात होणार असून स्पर्धेतील फायनलचा सामना ३ जूनला होणार आहे. याआधी ही स्पर्धा ८ शहरांमध्ये खेळवली जात होती. मात्र, आता ही स्पर्धा केवळ ६ शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध घरच्या मैदानावर आपला शेवटचा सामना खेळणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना १५ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार होता. मात्र, आता वेळापत्रकात बदल केल्यानंतर हा सामना २१ मे रोजी खेळवला जाणार आहे. ज्या क्रिकेट चाहत्यांनी १५ मे रोजी सामना पाहण्याची तिकिटं आधीच बुक केली होती त्यांचं काय होणार? त्यांना पुन्हा नवीन तिकिटं घ्यावी लागणार का? की मुंबई इंडियन्स त्यांना तिकिटांचे पैसे परत करणार? याबाबत आता मुंबई इंडियन्सने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
मुंबई इंडियन्सचा या हंगामातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना दिल्लीविरूद्ध खेळणार आहे. त्यामुळे या सामन्याची तिकिटं झटक्यात विकली गेली होती. मात्र, १५ मे रोजी होणारा सामना आता २१ मे रोजी खेळवलं जाणार आहे. आता मुंबई इंडियन्सने क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. १५ मे रोजी होणाऱ्या सामन्याचं तिकिट असलेले चाहते २१ मे रोजी होणारा सामना पाहण्यासाठी जाऊ शकतात.
हे त्या लोकांसाठी आहे, ज्यांना हा सामना पाहायला जाणं शक्य आहे. पण तिकिट असून सामना पाहायला जाणं शक्य होणार नाही, अशा चाहत्यांसाठी काय? तर काळजी करू नका, तुम्हाला तिकिटाचे पैसे परत मिळतील. त्यासाठी तुम्हाला बुक माय शोवर जाऊन रिफन्डसाठी अर्ज करावा लागेल. तिकिट रद्द झाल्यास पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये येतील, अशी माहिती मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्यला गुजरात टायटन्सचा दे धक्का
या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. त्यानंतर मुंबईने एका पाठोपाठ सहा सामने जिंकले. मुंबई इंडियन्सला सलग ७ सामने जिंकण्याची संधी होती. मात्र, घरच्या मैदानावर खेळताना मुंबईला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला. हा सामन्याचा निकाल मुंबईच्या बाजूने लागणार होता.
मात्र, शेवटच्या षटकात हा सामना मुंबईच्या हातून निसटला . मुंबई इंडियन्सच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने आतापर्यंत १२ पैकी ७ सामने जिंकले आहेत. १४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबईला आणखी दोन सामने खेळायचे आहे. जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर मुंबईला उर्वरीत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.