Meaning of Ee Sala Cup Namde: आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलची ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न पाहत होता. या संघात अनेक खेळाडू आले आणि गेले. विराट कोहली मात्र १८ वर्ष संघाबरोबर राहिला. कोहलीच्या बरोबरचे खेळाडू इतर संघासाठी पाच-पाच ट्रॉफी जिंकत असताना आरसीबीचा संघ मात्र अंतिम सामन्यात येऊन पराभूत होत होता. मात्र यावर्षी आरसीबीचं घोडं गंगेत न्हाहलं आणि आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर आरसीबीचं नाव कोरलं गेलं. यानिमित्ताने आरसीबीच्या चाहत्यांची ‘इ साला कप नामदे’चा नारा सत्यात उतरला आहे.

आयपीएल सुरू झाल्यानंतर आरसीबीचे चाहते दरवर्षी ‘इ साला कप नामदे’ची घोषणा देतात. मात्र १७ वर्ष आरसीबीच्या पदरात केवळ निराशा आली. १७ वर्षांत तीन वेळा फायनलमध्येही पोहोचून आरसीबीला जिंकता आलेले नव्हते. यावर्षी प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांना ‘इ साला कप नामदे’चे वेड लागले होते. अखेर आज विराट कोहलीसह आरसीबीच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली.

‘इ साला कप नामदे’चा अर्थ काय

आयपीएलमधील शहरांच्या नावाने असलेले संघ त्या त्या शहराच्या संस्कृतीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. मग चेन्नईचं विसल पोडू असेल किंवा मुंबईचा राजा रोहित शर्मा, अशी घोषणा असेल. प्रत्येक संघ आपल्या चाहत्यांना स्वतःशी जोडू पाहत असतो. याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने कन्नड भाषेतील ‘इ साला कप नामदे’ची घोषणा दिली.

‘इ साला कप नामदे’ हे कन्नड भाषेतील वाक्य असून याचा अर्थ होतो, यावर्षी कप आमचा आहे.

‘इ साला कप नमडू’ आरसीबीचा नवा नारा

आरसीबीने सामना जिंकल्यानंतर आरसीबीचे माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांनी विराट कोहलीला मिठी मारत विजयाचा आनंद व्यक्त केला. तसेच तिघांनीही एकत्र येऊन ‘इ साला कप नमडू’चा नारा दिला. ट्रॉफी जिंकल्यानंतर जुना नारा बदलून हा नवा नारा देण्यात आला होता. याचा अर्थ होतो, आम्ही कप जिंकलो आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीने सामना कसा जिंकला?

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावताना १९० धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज अगदी सहजगत्या या धावा करू शकले, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कारण दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सच्या विरोधात २०० हून अधिक धावांचे लक्ष्य लिलया गाठले होते. मात्र आज पंजाबचे फलंदाज धावांता पाठलाग यशस्वीरित्या करू शकले नाही. शशांक सिंहने नाबाद ३० चेंडूत ६१ धावा केल्या. पण तो पंजाबला विजय मिळवून देऊ शकला नाही.