पीटीआय, मुंबई : टिम डेव्हिड (११ चेंडूंत ३४ धावा) आणि तिलक वर्मा (१७ चेंडूत २१ धावा) यांच्या निर्णायक खेळीमुळे शनिवारी झालेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्सनी दिल्ली कॅपिटल्सवर पाच गडी आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. त्यामुळे दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाद फेरी गाठलीआहे.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत १६० धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (२) लवकर बाद झाला. यानंतर इशान किशन (४८ धावा) आणि डेवाल्ड ब्रेविसने (३७ धावा) चांगली खेळी करत संघाला सावरले. मग डेव्हिडने आक्रमक खेळी करत मुंबईला १९.१ षटकांत ५ बाद १६० धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने रोव्हमन पॉवेल (४३ धावा) आणि ऋषभ पंतच्या (३९ धावा) खेळीमुळे २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली कॅपिटल्स : २० षटकांत ७ बाद १५९ (रोव्हमन पॉवेल ४३, ऋषभ पंत ३९; जसप्रीत बुमरा ३/२५) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.१ षटकांत ५ बाद १६० (इशान किशन ४८, डेवाल्ड ब्रेविस ३७; शार्दुल ठाकूर २/३२)