आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल संघाची कामगिरी काही विशेष झाली नाही. सात सामन्यांत चार पराभव आणि तीन विजयांसह संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मात्र, संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगचे मत आहे की, त्यांच्या संघाला विजयी मार्गावर परतण्यासाठी फक्त गतीची गरज आहे. क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर पाँटिंगने अनेक विषयांवर चर्चा केली. राजस्थानविरुद्धचा सामना खोलीत पाहताना तीन ते चार टीव्हीचे रिमोट तोडल्याचे त्याने सांगितले. याशिवाय अनेक पाण्याच्या बाटल्याही भिंतीवर फेकल्याचे सांगितले.

दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला वाटते की आयपीएलमधील त्याच्या संघाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही गतीची आवश्यकता आहे कारण त्यांचा संघ इतका चांगला आहे की निकाल त्यांच्यासाठी अनुकूल असतील. केवळ २-३ षटकांमुळे संघ मागे पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

“संघ एका सामन्यात ३६ ते ३७ षटकांपर्यंत चांगला खेळतो, पण संपूर्ण सामना तीन ते चार षटकांत हरतो. याच कारणामुळे संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, असे पाँटिंग म्हणाला. त्याचवेळी पाँटिंगने आपल्या खेळाडूंना विजयासाठी जास्त टेन्शन घेऊ नका,” असेही म्हटले आहे.

“मला माहित आहे की आम्ही मार्गावर परत येण्याच्या खूप जवळ आहोत. आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हाला सकारात्मक राहण्याची गरज आहे. जितके जास्त आम्ही इथून परत येण्याचा प्रयत्न करू आमच्यासाठी तितक्या गोष्टी कठीण होतील. आम्ही तेच काम संयमाने करणार आहोत, जे आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोत आणि निकाल आपोआप आमच्या बाजूने येतील. आमचा संघ इतका चांगला आहे की निकाल आमच्या बाजूनेच लागला पाहिजे,” असेही पाँटिंगने म्हणाला.

क्वारंटाईनमध्ये अनेक रिमोट तोडले

पाँटिंगने सांगितले की, दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामना एका खोलीत पाहणे त्याच्यासाठी खूप त्रासदायक होते. पाच दिवसांनंतर खोलीतून बाहेर आलेल्या पाँटिंगने सांगितले की, यावेळी त्याने तीन-चार रिमोट तोडले आणि अनेक पाण्याच्या बाटल्या भिंतीवर फेकल्या. त्या सामन्यात गोष्टी ठीक झाल्या नाहीत.

पाँटिंग म्हणाला,जेव्हा तुम्ही प्रशिक्षक असता तेव्हा हे खूप अवघड असते, पण गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात. त्याचवेळी, करोनाच्या बाबतीत, तो म्हणाला की, त्यांच्या संघात उर्वरित संघांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह आढळले. पण आता यातून सावरत त्याचा संघ चांगली कामगिरी करेल आणि स्पर्धेच्या उत्तरार्धात चांगला खेळ दाखवेल आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल अशी त्याला आशा आहे.