कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि मार्गदर्शक असलेल्या गौतम गंभीरने केकेआर-आरसीबीच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कौतुक केले. गंभीरने सोशल मीडियावर आरसीबीचे कौतुक करणारी पोस्ट केली आहे. केकेआरविरूद्धच्या सामन्यात विराटच्या संघाने केलेली कामगिरी पाहून गंभीरही प्रभावित झाला.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करत आरसीबीला २२२ धावांचे लक्ष्य दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबीने उत्कृष्ट कामगिरी करत २२१ धावा केल्या आणि थोडक्यासाठी अवघ्या एका धावेने सामना गमावला. आरसीबीच्या सर्वच फलंदाजांनी या धावसंख्येत आपले योगदान दिले. या सामन्यातील आरसीबीची कामगिरी पाहून गंभीरही प्रभावित झाला आणि आरसीबीने या सामन्यात चांगली झुंज दिली असे त्याने कौतुक केले.

गंभीरने एका मुलाखतीत आरसीबीबद्दल बोलताना मोठे वक्तव्य केले होते. जेव्हा RCB विरुद्धचा सामना असतो तेव्हा गंभीर नेहमीच उत्साही असतो. या हंगामाच्या सुरुवातीला गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले होते की, “एक असा संघ आहे ज्याला मला नेहमीच मला पराभूत करायचे आहे आणि अगदी स्वप्नातही तो म्हणजे RCB. जेव्हा गंभीरला या मागचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, मला त्या संघाला पराभूत करायचे आहे. कदाचित दुसरा-सर्वात हाय प्रोफाइल आणि वलयांकित संघ आहे. या फ्रँचायझीचे मालक तसेच एकेकाळी गेल, कोहली, एबी या संघाच्या ताफ्यात होते. यांनी एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही, तरीही त्यांनी सर्वकाही जिंकलं आहे असं त्यांना वाटतं. अशी वृत्ती मला आवडत नाही किंवा मी सहन करू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतवर्षीच्या आयपीएलमध्ये गंभीर हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता, त्यावेळेस विराट कोहली आणि गंभीरमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. त्यानंतर यावर मोठी चर्चाही सुरू होती. पण यंदा हे दोन्ही दिग्गज खेळाडू भेटल्यानंतर मात्र एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. तर केकेआरच्या संघाने ईडन गार्डन्सवरील सामन्यापूर्वी मैदानावर गंभीर आणि कोहली एकमेकांशी हसत खेळत चर्चा करत असतानाचा व्हीडिओही शेअर केला होता.