IPL 2025 Injury Scare for Mumbai Indians Ahead of Eliminator: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील सामन्यांना सुरूवात झाली आहे. पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्स आणि आरसीबी यांच्यात झाला. आरसीबीने हा सामना जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता एलिमिनेटर सामना आज ३० मे रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे.
आयपीएल २०२५ ला एका आठवड्याची स्थगिती मिळाल्यामुळे प्लेऑफचे सामने उशिरा झाले. त्यामुळे अनेक संघांमधील खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशी परतले. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडूंचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमधील ३ खेळाडू मायदेशी परतले आहेत. पण आता अजून २ खेळाडू दुखापतीमुळे एलिमिनेटर खेळू शकणार नसल्याचे चित्र आहे.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि कार्बिन बॉश हे मायदेशी परतले. त्यामुळे मुंबईच्या ताफ्यात तीन नवे खेळाडू दाखल झाले. ज्यांची नाव जॉनी बेयरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चरिथ असलंका यांना बदली खेळाडू म्हणून संघात सामील केलं आहे. पण आता संघाचे अजून दोन खेळाडू संघाबाहेर होण्याचा मुंबईला धोका आहे.
मुंबई इंडियन्सचे दोन खेळाडू दीपक चहर आणि तिलक वर्मा हे एलिमिनेटर सामन्यासाठी फिट नसल्याचे व्हायर व्हीडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर आता प्रमुख खेळाडू दीपक चहर आणि तिलक वर्मा यांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संघाबरोबर प्रवास करताना चहरला विमानतळावर चालताना त्रास होत होता, ज्यामुळे एलिमिनेटरसाठी तो उपलब्ध असेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मधल्या फळीतील विश्वासार्ह खेळाडू तिलक वर्मा देखील गुडघ्याच्या दुखापतीमुळे अस्वस्थ असल्याचे दिसून आले.
शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करल्यानंतर क्वालिफायर १ खेळण्याचे हातातून निसटल्यावर मुंबई इंडियन्स आधीच दबावाखाली आहे. मुंबईने १४ सामन्यांत आठ विजयांसह गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे आणि आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना एलिमिनेटर जिंकणे आवश्यक आहे. यादरम्यान आता संघाला खेळाडूंची कमी जाणवताना दिसत आहे.
दीपक चहरला पंजाब किंग्सविरूद्ध अखेरच्या साखळी सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास जाणवला होता. जर गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यासाठी दीपक चहर आणि तिलक वर्मा उपलब्ध नसल्यास त्यांना इतर खेळाडूंचा पर्याय शोधावा लागेल. महत्त्वाच्या सामन्यात नव्या खेळाडूंना थेट संधी देणं, संघासमोर मोठं आव्हान असेल.
मुंबई इंडियन्सला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करणं अनिवार्य असणार आहे. मुंबईने जर आजचा सामना गमावला तर ते स्पर्धेबाहेर होतील. त्यामुळे गुजरातविरूद्ध सामन्यात मुंबईची प्लेईंग इलेव्हन कशी असणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.