Rohit Sharma Statement on Mumbai Indians Win: मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर २० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह मुंबईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. रोहित शर्माने ८० धावांची वादळी खेळी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला. तर बुमराहने आपल्या गोलंदाजीने सामना फिरवला.
रोहित शर्माला एलिमिनेटरमध्ये सूर गवसला आणि त्याने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. रोहित शर्माचं शतक हुकलं असलं तरी त्याने संघाला एका मजबूत स्थितीत नेण्यात मोठी भूमिका बजावली. रोहित शर्माला या सामन्यात सुरूवातीच्या षटकांमध्ये दोन वेळा जीवनदान मिळालं. याचा रोहितने चांगला फायदा उचलत मोठी खेळी केली.
रोहित शर्माच्या मॅचविनिंग ८० धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला हर्षा भोगले यांनी विचारलं की, तू जेव्हा जेव्हा अर्धशतक केलं आहेस तेव्हा संघ जिंकला आहे, यावर रोहित म्हणाला, “मी चार अर्धशतकंच केली आहेत. पण मला अजून अशा अर्धशतकी खेळी करायला आवडतील. एलिमिनेटर सामन्यात अशी खेळी खेळण्याचं महत्त्व मला माहितीये आणि अशा फॉर्ममधून येत ही खेळी खेळणं, महत्त्वाचं होतं.”
पुढे रोहित शर्मा म्हणाला, “सांघिक कामगिरी पाहून मला खूप अभिमान वाटतोय. मी जेव्हा सामना खेळण्यासाठी उतरतो, तेव्हा इतर सर्व गोष्टी मी बाजूला ठेवतो. संघासाठी कशी चांगली कामगिरी करू शकतो यावर माझा फोकस असतो.”
रोहित झेल सोडल्यानंतरच्या खेळीबाबत म्हणाला, “मला नशीबाने जी साथ दिली होती, त्याचा मला पुरेपूर फायदा करून घ्यायचा होता. मला आनंद आहे की मी ते करू शकलो. संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊ शकलो. दव पडल्याने पुढे स्थिती आव्हानात्मक होणार, याची कल्पना होती. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.”
रोहित दोनदा बाद होण्यापासून वाचल्याबाबत सांगताना म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी स्पर्धेत यापूर्वीही असे शॉट्स खेळलो आहेत आणि क्षेत्ररक्षकांनी मला झेलबाद केलं आहे. एक दिवस असा असतो जिथे भाग्य तुमच्यासोबत असतो आणि माझ्यासाठी आजचा दिवस तो होता. मी भाग्यवान होतो कारण ते झेल सोडले गेले. पण त्यानंतरही तुम्हाला खेळायचं असत. माझं लक्ष्य मोमेंटम आणि तो टेम्पो कायम राखण्यावर होतं”, असे रोहितने सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर सांगितलं.
जॉनी बेयरस्टोबाबत रोहित म्हणाला, “जॉनी त्याला मी विरूद्ध संघांकडून खेळताना इतकी वर्ष पाहिलं आहे. तो किती क्वालिटी खेळाडू हे आपल्याला माहितीये. या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा त्याला मोठा अनुभव आहे. त्याची खेळी पाहून तो पहिलाच सामना खेळतोय असं वाटलं नाही. आम्हाला चांगली सुरूवात मिळाली आणि त्याचं आम्ही मोठ्या खेळीत रुपांतर केलं.”
मुंबई इंडियन्स आता दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी पंजाब किंग्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.