महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे ऋणानुबंध खास असे आहेत. पण सलग १६ हंगाम चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळल्यानंतर चेन्नईला आता नवा कर्णधार मिळाला आहे. नव्या हंगामात महेंद्रसिंह धोनीऐवजी मराठमोळा ऋतुराज गायकवाड कर्णधारपदाचा मुकूट सांभाळणार आहे. नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांच्या कर्णधारांच्या फोटोशूटला धोनीऐवजी ऋतुराज आला आणि काही क्षणातच चेन्नईचा नवा नेता कोण हे स्पष्ट झालं. २७वर्षीय ऋतुराजवर फलंदाज आणि कर्णधार म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान असेल. चेन्नईच्या कर्णधार म्हणून नियुक्तीच्या निमित्ताने ऋतुराजच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.

रणजी ट्रॉफीचा तो सामना ऋतुराजच्या चांगलाच लक्षात आहे. २०१५-१६ रणजी हंगामात महाराष्ट्राची झारखंडविरुद्ध लढत दिल्ली इथे सुरू होती. झारखंड संघाचा मेन्टॉर म्हणून दस्तुरखुद्द महेंद्रसिंग धोनी होता.

Ipl 2024 chennai super kings face lucknow super giants for second time
IPL2024 : लखनऊसमोर चेन्नईचे आव्हान
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Shubman Gill Surpasses Virat Kohli and Sanju Samson in Unique Record
IPL 2024: शुबमन गिलने विराट-सॅमसनला मागे टाकत रचला इतिहास, आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
CSK vs KKR Live Cricket Score Updates in Marathi
IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी

धोनीसमोर चांगलं खेळण्याचा ऋतुराजचा इरादा होता. मात्र या प्रयत्नात झारखंडच्या वरुण आरोनचा उसळता चेंडू ऋतुराजच्या बोटावर जाऊन आदळला. महाराष्ट्राचा अनुभवी खेळाडू केदार जाधवने ऋतुराजला खेळता येतंय का बघ, असं सांगितलं. ऋतुराजने दुखऱ्या बोटासह बॅटिंग करायचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळानंतर दुखणं वाढलं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज बाद झाला. त्यानंतर जे घडलं ते ऋतुराज विसरू शकणार नाही.

लंचवेळी महेंद्रसिंग धोनीने ऋतुराजच्या दुखापतीविषयी विचारायला आला. धोनीने ऋतुराजच्या बॅटवर ऑटोग्राफ दिला आणि त्याच्या बोटाला लावण्यात आलेल्या प्लॅस्टरवर ‘गेट वेल सून’ संदेश लिहिला.

२०१९मध्ये चेन्नईने २० लाख रुपये या बेस प्राईजला ऋतुराजला ताफ्यात समाविष्ट केलं. महेंद्रसिंग धोनीची भेट झाल्यानंतर ऋतुराजने त्या भेटीविषयी विचारलं- त्यावर धोनी म्हणाला, “मला अगदी स्पष्ट आठवतंय. तू प्रतिभावान खेळाडू आहेस, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा करत राहा”.

चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंह धोनी हे समानार्थी शब्द आहेत. महेंद्रसिंग धोनीला ‘थाला’ नावाने ओळखतात. धोनी चाळिशीपल्याड आहे. साहजिकच कर्णधार म्हणून त्याचा वारसदार कोण याची चर्चा होणं साहजिक. मध्यंतरी सीएसके व्यवस्थापनाने रवींद्र जडेजाकडे सूत्रं सोपवली. पण हा काटेरी मुकूट नको असं सांगत जडेजाने कर्णधारपद सोडलं. पुन्हा धोनीच कर्णधार झाला. यंदा मात्र नव्या हंगामाच्या आधीच चेन्नईने तरुण तडफदार ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. यानिमित्ताने मराळमोळा पुणेकर आयपीएल स्पर्धेतल्या सर्वाधिक यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नईचं नेतृत्व करताना दिसेल.

भारतीय क्रिकेटच्या आधुनिक शिलेदारांपैकी एक अशा महेंद्रसिंग धोनीने लक्षात ठेवलेला ऋतुराज आता आयपीएल स्पर्धेतील लोकप्रिय संघांपैकी एक अशा चेन्नईचं नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे.

सरळ बॅटने फटके खेळण्याची शैली, पारंपरिक वाटेल अशा पद्धतीने इनिंग्जची बांधणी, हवेत चेंडू मारण्याऐवजी खणखणीत ग्राऊंडस्ट्रोक, भागीदाऱ्या करण्याची हातोटी, चपळ क्षेत्ररक्षक, यश साजरा करतानाही शांत असं सेलिब्रेशन यामुळे ऋतुराजच्या नावाला पसंती मिळाली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचा अनुभव ऋतुराजला फायदेशीर ठरणार आहे.

पुणेकर ऋतुराज

ऋतुराजचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे हे आहे. पण ऋतुराज पुण्यात राहतो. थेरगावच्या व्हेरॉक-वेंगसरकर अकादमीचा ऋतुराज विद्यार्थी आहे.

मार्च महिन्यात चेन्नईत आयोजित कॅम्पमध्ये ऋतुराजच्या खेळाने धोनीला प्रभावित केलं होतं. महाराष्ट्रासाठी सातत्याने धावांच्या राशी ओतणारा बॅट्समन अशी ऋतुराजची ओळख आहे. २०१८-१९ सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक रन्स ऋतुराजच्या नावावर होत्या.

इंडिया ‘ए’ साठी खेळतानाही वेस्ट इंडिज ए विरुद्ध ऋतुराजने चार मॅचेसमध्ये २०७ धावा केल्या होत्या. श्रीलंका ए संघाविरुद्धच्या मालिकेतही ४७० रन्स केल्या होत्या. २०१९ मध्ये इंडिया ए साठी खेळताना ऋतुराजने श्रीलंका ए आणि वेस्ट इंडिज ए विरुद्ध खेळताना १८७, १२५, ९४, ८४, ७४, ३, ८५, २०, ९९ अशा खेळी केल्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ७ सामन्यात ६३.४२च्या सरासरीने ४४४ धावा केल्या होत्या.

आयपीएल पदार्पण

२०१९ हंगामात कोरोनामुळे आयपीएलचा हंगाम युएईत खेळवण्यात आला. युएईत दाखल झाल्यानंतर चेन्नई कॅम्पपैकी चौदाजणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये ऋतुराजचा समावेश होता. ऋतुराजच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह असल्याने तो प्रदीर्घ काळ खेळू शकला नाही. कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ऋतुराजला क्वारंटीन राहावं लागलं. मात्र संघातील प्रत्येकाने सकारात्मक राहायला मदत केली असं ऋतुराजने सांगितलं होतं.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने २२ सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले.

तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंह धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले. ०, ५, ० अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. मात्र सलग तीन मॅचमध्ये अर्धशतकी खेळी करत ऋतुराजने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. २०२० हंगामात ऋतुराजने ६ सामन्यात ५१च्या सरासरीने २०४ धावा केल्या.

टीम इंडियासाठी पदार्पण

प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना पर्यायी भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. ऋतुराजचा या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. 28 जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० लढतीत ऋतुराजला भारतीय संघाची कॅप देण्यात आली. ऋतुराजने पदार्पणाच्या लढतीत २१ तर दुसऱ्या सामन्यात १४ धावांची खेळी केली.

‘कमी बोलतो म्हणून कळत नाही’
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने २०२० हंगामावेळी ऋतुराजबद्दल भाष्य केलं होतं. “ऋतुराजला आम्ही नेट्समध्ये खेळताना पाहिलं. मात्र त्यानंतर त्याला कोव्हिड झाला. २० दिवस त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं. हे खूपच दुर्देवी होतं. उर्वरित सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली. त्याच्यासाठी हा हंगाम संस्मरणीय असेल.

“ऋतुराज अतिशय प्रतिभावान अशा खेळाडूंपैकी एक आहे. परंतु तो मितभाषी आहे. त्यामुळे त्याला समजून घेणं काही वेळेस संघव्यवस्थापनाला अवघड होतं. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर तो किती सर्वांगीण खेळू शकतो हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे.”

ऑरेंज कॅपचा मानकरी
ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या १४व्या हंगामात सर्वाधिक धावांसाठीच्या ऑरेंज कॅपवर नाव कोरलं होतं. ऋतुराजने १६ सामन्यात ६३५ धावा करत ऑरेंज कॅपचा मान पटकावला. अंतिम लढतीत फॅफ डू प्लेसिसने ८६ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर २ धावा करत ऋतुराजला मागे टाकण्याची संधी डू प्लेसिसकडे होती. मात्र तो बाद झाला आणि ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी असेल यावर शिक्कामोर्तब झालं.

एका षटकात ७ षटकारांचा विक्रम
२०२२ मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत ऋतुराजने उत्तर प्रदेश विरुद्ध खेळताना १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋतुराजने एका षटकात ७ षटकार मारण्याचा विक्रम केला. एक नोबॉल पडला त्यावरही षटकार बसला. एका षटकात ४३ धावा चोपणारा ऋतुराज पहिलाच फलंदाज ठरला होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ७ षटकार खेचणारा ऋतुराज पहिला फलंदाज ठरला आहे. ऋतुराजचं लिस्ट ए सामन्यातलं पहिलंच द्विशतक आहे. लिस्ट ए सामन्यात द्विशतक झळकावणारा ऋतुराज केवळ ११वा फलंदाज आहे.

अहमदाबाद इथल्या सरदार पटेल स्टेडियम बी ग्राऊंड इथे सुरू असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या शिवा सिंगच्या नवव्या ओव्हरमध्ये ऋतुराजने हा विक्रम केला होता. विजय हजारे चषक स्पर्धेत द्विशतक झळकावणारा ऋतुराज सातवा फलंदाज आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत नेतृत्व आणि सुवर्णपदक
२०२२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला. प्रमुख खेळाडूंचा संघ अन्यत्र दौऱ्यावर असल्याने निवडसमितीने या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंचा संघ निवडला. निवडसमितीने कर्णधार म्हणून ऋतुराजची निवड केली. त्याचवेळी ऋतुराजच्या नेतृत्वगुणांवर शिक्कामोर्तब झालं होतं. ऋतुराजच्या नेतृत्वातच भारतीय संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं.

अभिनेत्रीबरोबर अफेअरच्या अफवा ; लग्न क्रिकेटपटूशी
ऋतुराज आणि अभिनेत्री सायली संजीव यांचं अफेअर असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टवर लाल बदामांसह कमेंटनंतर या दोघांची जोडी जमल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. काही वर्षातच या सगळ्या अफवा असल्याचं सिद्ध झालं. गेल्यावर्षी ऋतुराज आणि क्रिकेटपटू उत्कर्षा पवार यांचं लग्न झालं. उत्कर्षाही क्रिकेटपटू असून तीही महाराष्ट्रासाठीच खेळते.