Shreyas Iyer Creates History As Captain in IPL: आयपीएल २०२५ मधील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबने मुंबईचा पराभव केला. पंजाबचा संघ या पराभवासह गुणतालिकेत टॉप-२ मध्ये राहणार आहे. त्यामुळे पंजाब किंग्स आता प्लेऑफमध्ये क्वालिफायर-१ सामना खेळतील. या विजयासह श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये असा विक्रम केला, जो इतिहासात कर्णधार म्हणून कोणताच खेळाडू साध्य करू शकला नाही.

पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली पंजाबने या वर्षी शानदार कामगिरी केली आहे आणि संघाने लीग टप्प्यात १४ पैकी ९ सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्ज सध्या १९ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर त्यांनी फक्त चार सामने गमावले आहेत. अंतिम फेरीसाठी जाण्याकरता पंजाब किंग्जचा सामना गुजरात टायटन्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल.

श्रेयस अय्यरने गेल्या काही काळामध्ये कर्णधार आणि खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतानाही अनेक विविध स्पर्धेची जेतेपद पटकावली आहेत. तर आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून गतवर्षी त्याने कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले. यानंतर आता श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांना क्वालिफायर-१ मध्ये घेऊन जाणारा पहिला कर्णधार बनला आहे. श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला क्वालिफायर-१ मध्ये नेले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने २०२० मध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले, तर २०२४ मध्ये कोलकाता संघाने पहिल्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आणि विजेतेपद जिंकले. आता अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाब किंग्ज २०१४ नंतर प्रथमच टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा क्वालिफायर-१ मध्ये संघाला नेण्याच्या बाबतीत अय्यर तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी अव्वस स्थानी आहे. ज्याने ७ वेळा संघाला क्वालिफायरमध्ये नेले आहे. तर रोहित शर्माने पाच वेळा ही कामगिरी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयस अय्यरने आतापर्यंत आयपीएलमधील ८४ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने ४९ जिंकले आहेत आणि ३३ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. लीगमध्ये ८३ सामन्यांमध्ये नेतृत्व केल्यानंतर अय्यर सर्वाधिक विजयांच्या बाबतीत गंभीरसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी ५० विजयांसह यादीत अव्वल स्थानावर आहे. यादरम्यान कर्णधार म्हणून, अय्यरने ८४ सामन्यांमध्ये ३६.३४ च्या सरासरीने २५०८ धावा केल्या आहेत.