उमरान मलिकच्या कामगिरीवर निवडकर्त्यांची नजर आहे. जसप्रीत बुमराहऐवजी उमरान मलिकला टी२० विश्वचषक संघात संधी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा तणाव वाढला आहे. बुमराह अद्याप टी२० विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही, पण बीसीसीआयने त्याचा पर्याय म्हणून घेऊ शकतात. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला पाठवले जाईल, असे मानले जात आहे.

इराणी चषकात पहिल्याच दिवशी शेष भारताच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत सौराष्ट्रला अवघ्या ९८ धावांत गुंडाळले. सौराष्ट्रच्या संघावर उमरान मलिक तुफान तुटून पडला. त्याने आपल्या वेगाने फलंदाजांना घाबरवले. मुकेश कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर उमरान मलिकने तीन फलंदाज बाद केले. सामन्याच्या पहिल्या दिवशी तुफानी गोलंदाजी करत उमरान मलिकने सौराष्ट्राच्या गोटात खळबळ निर्माण केली. त्याच्या वेगवान आणि स्विंग होणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांची पळताभुई थोडी केली. ५ षटकांच्या गोलंदाजीत ३ बळी घेतले. कालच्या सामन्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती उमरानच्या त्या एका यॉर्कर चेंडूची. अतिवेगाने चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिकचा हा चेंडू हवेत उडाला आणि ऑफ स्टंप उडून गेला. इराणी चषकामध्ये उर्वरित भारताकडून खेळताना उमरान मलिकने आपल्या कामगिरीने चांगली छाप पाडली आहे.

हेही वाचा  : इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : सर्फराजच्या झुंजार शतकामुळे शेष भारताचे वर्चस्व

भारतीय संघात ऑस्ट्रेलियामध्ये जिथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते तिथे उमरानचा पर्याय नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. आत्ताच सांगणे अशक्य आहे असे बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भविष्यात मात्र आगामी टी२० विश्वचषकासाठी त्याची निवड होऊ शकते असे भाकीत वर्तवण्यास काही हरकत नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे. शेवटी निर्णय हा कर्णधार, निवड समिती आणि संघव्यवस्थापन यांनाच घ्यायचा आहे.