मुंबई : रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी त्रिकुटाच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघात निश्चितच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र, भारतीय क्रिकेटमधील प्रतिभा आणि गुणवत्ता पाहता, या दिग्गजांची जागा घेऊ शकतील असे खेळाडू त्यांना नक्कीच सापडतील. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही, असे मत इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रूटने व्यक्त केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित कसोटी मालिकेला शुक्रवारपासून लीड्स येथे सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सध्या संक्रमणातून जात असल्याने पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, नव्या दमाच्या भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळणेही आव्हानात्मकच असेल, असे रूटला वाटते.
‘‘क्रिकेटच्या सर्वच प्रारूपांत भारताकडे खेळाडूंचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच काही वेळा अंतिम ११ खेळाडूंची निवड करणेही त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरते. त्यांच्या कसोटी संघातही गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे कसोटी मालिका चुरशीची होणे अपेक्षित आहे. आम्ही घरच्या मैदानांवर खेळणार असल्याने येथील परिस्थितीचा फायदा मिळू शकेल. मात्र, भारताकडे उत्तम वेगवान मारा, घरच्या व बाहेरील मैदानांवर चमक दाखवणारे फिरकीपटू, तसेच फलंदाजीतही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या काही वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतली असली, तरी आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही,’’ असे रूट निवडक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला. या मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन-३ वाहिनीवर करण्यात येणार आहे.
रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीमुळे मालिकेतील चुरस कमी होणार नाही, असेही रूटला वाटते. ‘‘ हे दोघेही भारताचे आघाडीचे फलंदाज होते. त्यांनी आपापल्या कारकीर्दीत लक्षवेधी कामगिरी केली. त्या दोघांनीही संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे त्यांची जागा घेणे सोपे नसेल. मात्र, इतर खेळाडूंना आता भारताकडून आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. गिलही आपले नेतृत्वगुण दाखवण्यास तयार असेल. त्यामुळे मालिकेत चांगली चुरस पाहायला मिळेल,’’ असे रूटने नमूद केले.
बुमरापासून धोका
‘‘जसप्रीत बुमरा हा एक अविश्वसनीय खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी सर्वांनाच माहीत आहे. तो ज्या सामन्यात खेळतो, तेथे तो आपला प्रभाव पाडतो. त्यामुळे आमच्यासाठी तो नक्कीच धोका असेल. त्याच्याविरुद्ध आम्हाला अधिक खबरदारी बाळगावी लागेल,’’ असे रूट म्हणाला.
विक्रमाचा विचार नाही
कसोटीत रूटच्या नावे १३,००६ धावा आहेत. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने कसोटीत सर्वाधिक १५,९२१ धावा केल्या आहेत. रूट आता सचिनच्या विक्रमापासून २९१५ धावांनी मागे आहे. मात्र, आपण त्याबाबत विचार करत नसल्याचे रूटने स्पष्ट केले. ‘‘माझे लक्ष्य नेहमीच संघासाठी चांगला खेळ करण्याचे राहिले आहे. मी कधीच सचिनच्या कसोटी विक्रमावर लक्ष केंद्रित करून कामगिरी केली नाही. मी नागपूर येथे पहिला कसोटी सामना खेळलो होतो, तेव्हा इथवर पोहोचेन असे वाटले नव्हते,’’ असे रूट म्हणाला.
विराटशी कधीही स्पर्धा नव्हती…
गेल्या दशकात जो रूट, विराट कोहली, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे विश्वातील चार सर्वोत्तम फलंदाज मानले जात होते. मात्र, माझी विराट किंवा अन्य कोणाशीही स्पर्धा नव्हती असे रूट म्हणाला. ‘‘मी नेहमीच विराटचे कौतुक केले आहे. त्याचा खेळ मी पाहात आलो आहे. मात्र, मी कधीही त्याच्याशी स्पर्धा करत नव्हतो. कोणताही फलंदाज नेहमीच परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करत असतो. विराट नेहमीच मैदानावर आपली उपस्थिती जाणवून देतो. यापुढे त्याच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार नाही याचे नक्कीच दु:ख आहे. त्याच्या अनुपस्थितीत आता नवीन खेळाडूंना संधी मिळेल. तेही सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करतील,’’ असे रूटने सांगितले.