भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत करुण नायरला पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. ८ वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर त्याने भारतीय संघासाठी पुनरागमन केलं. पण पुनरागमनात त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. दोन्ही डावात तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना तो शून्यावर माघारी परतला. तर दुसऱ्या डावात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर २० धावा करत माघारी परतला.

पहिल्या डावात शून्यावर बाद

करुण नायरला ३००६ दिवसांनंतर भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या डावात तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सुरुवातीचे ३ चेंडू त्याने खेळून काढले. पण चौथ्या चेंडूवर त्याने नको तो फटका मारला आणि शून्यावर बाद होऊन माघारी परतला. बेन स्टोक्सने टाकलेल्या चेंडूवर करुण नायरने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थांबून आल्यामुळे फटका फसला. ओली पोपने शानदार झेल घेत करुण नायरच्या खेळीला पूर्णविराम दिला.

चांगली सुरूवात मिळाली पण एक चूक महागात पडली

दुसऱ्या डावात फलंदाजीला आला त्यावेळी ऋषभ पंत नुकताच बाद झाला होता आणि केएल राहुल शतक झळकावलं होतं. त्यामुळे करुण नायरला खेळपट्टीवर टिकून केएल राहुलला साथ द्यायची होती. पण केएल राहुल १३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर राहुल पाठोपाठ करुण नायरनेही पॅव्हेलियनची वाट धरली.

तर झाले असे की, इंग्लंडकडून ८६ वे षटक टाकण्यासाठी ख्रिस वोक्स गोलंदाजीला आला. वोक्सने फुल लेंथ चेंडू टाकला. या चेंडूवर करुण नायरने स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू सरळ ख्रिस वोक्सच्या हातात गेला. ख्रिस वोक्सने सोपा झेल घेतला आणि करुण नायरचा डाव २० धावांवर आटोपला.

इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव ३६४ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक १३७ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने ११८ धावा चोपल्या. या दोन्ही फलंदाजांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे.