India vs Australia WTC Final 2023: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा महान सामना तटस्थ मैदानावर होणार आहे. हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात तीन नवीन नियम पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर हा जेतेपदाचा सामना कूकाबुरा किंवा एसजी चेंडूऐवजी विशेष प्रकारच्या चेंडूने खेळवला जाईल.

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाचे आयोजन –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान होणाऱ्या या मोठ्या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल.

अंतिम सामना ड्यूक चेंडूने होईल –

कसोटी क्रिकेट भारतात एसजी आणि ऑस्ट्रेलियात कुकाबुरा चेंडूने खेळले जाते. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्यूक चेंडूने खेळवला जाईल. भारतीय संघाने आयपीएलदरम्यानच ड्यूक बॉलने सराव सुरू केला होता, जेणेकरून संघाला पुढील अडचणींना सामोरे जावे लागू नये.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी टीम इंडियाने नवीन जर्सीमध्ये केले फोटोशूट, पाहा भारतीय संघाचा नवा लूक

अंतिम सामन्यात हे तीन नवे नियम पाहायला मिळणार –

१.वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाला हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.
२.वेगवान गोलंदाजीविरुद्ध यष्टिरक्षण करताना यष्टिरक्षकाने हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.
३. विकेटसमोर क्षेत्ररक्षक फलंदाजाजवळ क्षेत्ररक्षण करत असतील, तर त्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक असेल.

सामना अनिर्णित राहिला तर विजेता कोण ठरणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा सामना अनिर्णित राहिला, तर एका संघाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. म्हणजेच ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये विभागली जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, चॅम्पियनशिप किंवा स्पर्धेचा अंतिम ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

राखीव दिवसाचा वापर केव्हा होणार –

पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास १२ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, हा राखीव दिवस तेव्हा वापरला जाईल, जेव्हा कोणत्याही एका दिवशी खेळात ९० षटके टाकता आली नाही, किंवा सहा तासांचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. दुसरीकडे, पावसाने संपूर्ण सामन्यात व्यत्यय आणल्यास, दोन्ही संघांना विजयी केले जाईल.

हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी फलंदाजीबाबत रोहित शर्माचा खुलासा; म्हणाला, ओव्हलवर ‘हे’ सर्वात मोठे आव्हान असेल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, टेस्ट हेड टू हेड –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण १०६ कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ४४ आणि भारताने ३२ सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, २९ कसोटी सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत राहिला आहे.