Rohit Sharma Meets Maharashtra CM Devendra Fadnavis: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि अनुभवी कर्णधार रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केलं. रोहित शर्माने ७ मे रोजी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. हिटमॅनने आपल्या लहानशा कसोटी कारकिर्दीत त्याने आपली छाप पाडली. याशिवाय रोहितने आपल्या नेतृत्त्वाने सर्वांना प्रभावित केलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्माची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रोहितची भेट घेतली. रोहितला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल वैयक्तिक भेट घेत त्याचं अभिनंदन केलं. २०११ ते २०२५ या १४ वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीबद्दल फडणवीस यांनी रोहित शर्मा याचे कौतुक केले.

रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर ७ मे रोजी शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याच्या कसोटी कॅपचा फोटो होता आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ” मला सर्वांना हे सांगायचं आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचं नेतृत्त्व करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला इतकं वर्ष खूप प्रेम आणि कायम पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहितबरोबरच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या निवासस्थानी वर्षा इथे भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची भेट घेतली आणि त्याच्याशी संवाद साधणं हा खूप चांगला अनुभव होता. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्याला शुभेच्छा दिल्या!”

भारताच्या अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला चांगली कामगिरी करता आली नाही. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने फक्त ३६ धावा केल्या. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातही त्याच्या फॉर्ममुळे त्याने स्वत:ला संघाबाहेर केलं होतं. पण या मालिकेनंतर रोहितच्या कसोटीमधील भविष्याबद्दल मोठी चर्चा होती. पण रोहितने आता निवृत्ती घेत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २०१३ ते २०२४ दरम्यान ६७ कसोटी सामने खेळले. दरम्यान, त्याने ११६ डावांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. रोहितच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १२ शतकं आणि १८ अर्धशतकं आहेत.