Shoaib Akhtar on Indian Cricket: शोएब अख्तरला क्रिकेटमधून निवृत्त होऊन जरी बराच काळ लोटला असला तरी तो अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्यावरून जरी कितीही मोठा वाद निर्माण झाला तरी तो रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. शोएबने पुन्हा एकदा असेच काहीसे केले आहे. एका भारतीय क्रीडा पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्याने पाकिस्तान क्रिकेटबद्दल बरेच काही सांगितले आहे. शोएब अख्तर म्हणाला की, “भारतातून येणाऱ्या पैशावर पाकिस्तान क्रिकेट चालते.”

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान शोएब अख्तरने हे मान्य केले. तो म्हणाला की, “बीसीसीआय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून आयसीसीकडे येणारा पैसा महसूल वाटणीअंतर्गत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठवतो. पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटपटूंना त्या पैशांच्या जोरावरच मॅच फी मिळते. त्यामुळे एकप्रकारे भारतातून येणाऱ्या पैशावर आमचे क्रिकेट चालते.”

हेही वाचा: Asia Cup: PCBने जय शाहांना दिले पाकिस्तान भेटीचे निमंत्रण, आशिया कप उद्घाटनला जाणार? BCCIने काय दिले उत्तर? जाणून घ्या

रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तर पुढे म्हणाले, “२०२३ विश्वचषक हा सर्वात वेगळा आणि रोमांचक असेल. कारण मला आता ५० षटकांच्या क्रिकेटचे भविष्य दिसत नाही. या विश्वचषकातून भारताने भरपूर कमाई करावी अशी माझी इच्छा आहे. हे सांगायला अनेकांना संकोच वाटेल पण मी स्पष्टपणे सांगतो की, भारताचा महसूल आयसीसीला जातो. त्याचा वाटा पाकिस्तानातही येतो आणि त्यातून आपल्या देशांतर्गत क्रिकेटपटूंना मॅच फी मिळते. म्हणजेच भारतातून येणाऱ्या पैशातून आपल्या युवा क्रिकेटपटूंचे पालनपोषण होत आहे.”

माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल म्हणाला, “पुन्हा एकदा टीम इंडियावर दबाव असेल.” त्यांनी यामागील कारण देखील सांगितले. तो पुढे म्हणाला की, “भारतीय मीडियामुळे टीम इंडियावर खूप दडपण येत आहे आणि हे प्रत्येक वेळी घडते. भारत पाकिस्तानकडून हरत नाही कारण त्याच्याकडे प्रतिभावान खेळाडू नाहीत असे नाही पण, मीडियाचा त्यांच्यावर खूप दबाव असतो.”

हेही वाचा: Sourav Ganguly: कोहलीच्या समर्थनार्थ गांगुली मैदानात, शोएब अख्तरला दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “’विराटला कोणत्याही फॉर्मेटमधून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना अख्तर म्हणाला की, “मागच्या वेळीही आशिया चषकादरम्यान भारतीय मीडियाने टीम इंडियावर खूप दबाव आणला होता. संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगात रंगवण्यात आले होते. टीम इंडिया पाकिस्तानला सहज हरवणार असल्याचं बोललं जात होतं. यामुळे आमच्यावर कामगिरीचे कोणतेही दडपण नव्हते. याचा परिणाम असा झाला की, भारत दडपणाखाली तुटून पडला आणि आम्ही मुक्तपणे खेळून सामना जिंकला. त्यामुळे मुळात हा दबाव टाकणे बंद झाले पाहिजे.”