भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. आशिया चषक २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पाकिस्तानला आशिया चषक २०२३ चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला टीम इंडियाला पाठवण्यास तयार आहे पण यासंदर्भातील अंतिम निर्णय हा भारत सरकारचा असेल. सरकारकडून मान्यता मिळाल्यास २००८ नंतर भारत पुढील वर्षी पाकिस्तानला भेट देऊ शकतो.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार २०२३ मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा पाकिस्तान दौरा निश्चितपणे तत्कालीन सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल, परंतु सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अजेंड्यावर नक्कीच आहे. . पाकिस्तान २०२३ च्या उत्तरार्धात ५० षटकांच्या आशिया चषकाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यानंतर भारतात विश्वचषक होणार आहे. सहाय्यक व्यवस्थापकाच्या (एजीएम) नोटनुसार, बीसीसीआय पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहे.

सामरिक, राजकीय मुद्द्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बऱ्याच दिवसांपासून खेळली जात नाही. आता दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील हे निश्चित आहे. आशिया चषकाशिवाय आगामी काळात पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचेही यजमानपद भूषवणार आहे.

हेही वाचा :  PAK vs NZ:  पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाने केले फिलिप्सच्या बॅटचे दोन तुकडे, पाहा हा खास video 

१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सहाय्यक व्यवस्थापकाच्या बैठकीनंतर(एजीए), बीसीसीआयने गुरुवारी सर्व राज्य संघटनांना एक नोट पाठवली आहे, ज्यामध्ये पुढील वर्षापर्यंतचे भारताचे वेळापत्रक आहे. या नोंदीनुसार, भारताला पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत महिला टी२० विश्वचषक आणि त्यानंतर U-१९ आणि टी२० विश्वचषक खेळायचा आहे. पाकिस्तानमध्ये होणारा आशिया चषक हाही या योजनेचा एक भाग आहे. आशिया चषक पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय प्रकारात होणार आहे. या आशिया चषकानंतर भारतात विश्वचषक होणार आहे.

हेही वाचा :  PAK vs NZ:  टी२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानने दाखवली ताकद, न्यूझीलंडला त्यांच्याच घरात हरवून जिंकली तिरंगी मालिका 

सहाय्यक व्यवस्थापकाच्या नोंदीनुसार, सरकारने परवानगी दिल्यास बीसीसीआय भारताला पाकिस्तानला पाठवण्यास तयार आहे. गेल्या वेळी पाकिस्तानला यजमानपद देण्यात आले होते, तेव्हा बीसीसीआय त्यासाठी तयार नव्हते आणि आशिया चषक युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. याबाबत क्रिकबझने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याशी बोलले असता, त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितले की, ते सरकारच्या अखत्यारीत असल्याने यावर निर्णय घेऊ शकत नाही. विशेष म्हणजे आता बीसीसीआयचे सचिव जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे इतरत्र स्पर्धा आयोजित करणे अवघड काम नाही. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.