आगामी इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय खेळणे निश्चित आव्हानात्मक असेल, पण त्यांच्या निवृत्तीमुळे अन्य क्रिकेटपटूंसाठी संधी निर्माण झाली आहे. त्यांनी पुढे येऊन जबाबदारी घेणे आवश्यक आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले.

‘आयपीएल’चा १८वा हंगाम अखेरच्या टप्प्यात असतानाच सर्वांच्या नजरा भारतीय कसोटी संघाच्या घोषणेकडे होत्या. मात्र, त्यापूर्वीच एका आठवड्याच्या अंतराने रोहित आणि कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केला. त्यामुळे निवड समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी संघ जाहीर केला जाणे अपेक्षित आहे.

रोहित आणि विराटच्या निवृत्तीचा विषय निघाल्यावर, ‘‘खेळायला सुरुवात करण्याचा आणि तो संपवायचा, हे दोन्ही निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असतात. यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही,’’ असे गंभीर म्हणाला. ‘‘रोहित आणि विराट यांची गुणवत्ता सर्वांनाच ठाऊक आहे. या दोघांच्या निवृत्तीमुळे येणारा काळ कठीण असेल यात शंका नाही. मात्र, नवोदित खेळाडूंना आपली परिपूर्णता सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यांनी त्याचे सोने करायला हवे,’’ असे गंभीरने नमूद केले.

रोहित आणि कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२०, तसेच कसोटीतून निवृत्त घेतली असली, तरी ते एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहेत. ते २०२७च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतील का, या प्रश्नावर मात्र गंभीरने सावध भूमिका घेतली. ‘‘एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अजून बराच वेळ आहे. त्यापूर्वी ट्वेन्टी-२० विश्वचषक आहे आणि ही स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही इंग्लंड दौऱ्यावर लक्ष केंद्रित करू आणि त्यानंतर नवे उद्दिष्ट ठरवू,’’ असे गंभीरने स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ कर्णधाराची नाही, तर रोहित आणि विराटच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात अनुभवाची कमतरता जाणवणार आहे. नेतृत्व आणि अनुभव अशी दुहेरी पोकळी भरून काढणे सोपे नाही. – गौतम गंभीर, प्रशिक्षक, भारतीय पुरुष क्रिकेट संघ.