Ravi Shastri on Yashasvi Jaiswal : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे तिसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या चमकदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. भारताच्या पहिल्या डावात यशस्वीला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले होते, मात्र त्याची भरपाई त्याने दुसऱ्या डावात केली. तिसऱ्या दिवशी तो १०४ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मात्र, चौथ्या दिवशी तो मैदानात परतला आणि त्याने झटपट द्विशतक झळकावले आणि २१४ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.

यशस्वीच्या या खेळीवर रवी शास्त्रींनी त्याच्या कौशल्याची तुलना महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरशी केली आहे. यशस्वीच्या २१४* धावा आणि सर्फराझ खानच्या नाबाद ६८ धावांमुळे भारताने आपला दुसरा डाव ४ गड्यांच्या मोबदल्यात ४३० धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव १२२ धावांवर गारद झाला.

रवी शास्त्री म्हणाले, “यशस्वी जैस्वालने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. केवळ बॅटनेच नाही तर मैदानावरील त्याची कामगिरी आणि वर्तनही उत्कृष्ट होते. मला वाटते की पुढे जाऊन तो रोहितच्या अर्धवेळ गोलंदाजी पर्यायांपैकी एक असू शकतो. त्याला गोलंदाजीही दिली जाऊ शकते.”

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : भारत ‘यशस्वी’, बॅझबॉल तंत्रासह दणदणीत विजय

“यशस्वी मला युवा तेंडुलकरची आठवण करून देतो”

माजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, “यशस्वी मला युवा तेंडुलकरची आठवण करून देतो. तो मैदानावर सतत व्यस्त असतो. ‘जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर अशक्य काहीच नाही.’ या सुप्रसिद्ध म्हणीचे सर्वात उज्ज्वल उदाहरणांपैकी तो एक आहे. अशक्य काहीच नाही.’ ही फक्त एक म्हण आहे, परंतु यशस्वीने आपल्या कामगिरीने ती खरी करुन दाखवली आहे.”

हेही वाचा – IND vs ENG : द्विशतकानंतर यशस्वी जैस्वालची विराट-कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी, गावसकरांच्या क्लबमध्येही मिळवले स्थान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी जैस्वालने मोडला गांगुलीचा १७ वर्षे जुना विक्रम –

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ५४५ धावा केल्या आहेत. आता भारतासाठी कोणत्याही कसोटी मालिकेत डावखुरा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. पण यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता, ज्याने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण ५३४ धावा केल्या होत्या.