जोहान्सबर्ग येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी केएल राहुलला संघाचा कप्तान करण्यात आले. मात्र आता तिसऱ्या कसोटीत विराट संघात परतणार का याविषयी चर्चा रंगत आहेत. ११ जानेवारीपासून उभय संघात निर्णायक कसोटी रंगणार आहे. या कसोटीत विराटच्या खेळण्याविषयी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली पुढच्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही हे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले. विराट कोहली सध्या फिट असून तो पुढील सामना खेळू शकतो, असे द्रविडने म्हटले आहे. विराटच्या जागी दुसऱ्या कसोटीत हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीचा परिणाम टीम इंडियाच्या फलंदाजीवरही दिसून आला आणि दोन्ही डावात संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – IPL 2022 : करोनामुळं BCCI उचलणार ‘हे’ मोठं पाऊल; यंदाची संपूर्ण स्पर्धा…

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला, ”विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त असावा. मी नेट्समध्ये त्याचा सराव करून घेईन. आशा आहे की केपटाऊनमधील काही नेट्स सत्रांनंतर तो खेळण्यासाठी तयार होईल. मी फिजिओशी जास्त बोललो नाही, पण कोहलीच्या फिटनेसमध्ये खूप सुधारणा होत आहे आणि चार दिवसांचा कालावधी आहे आणि तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे.”

भारताने गमावली दुसरी कसोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णधार डीन एल्गरने (१८८ चेंडूंत नाबाद ९६ धावा) केलेल्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गवरील पाहुण्या भारताच्या वर्चस्वाला शह दिला. आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत भारतावर सात गडी राखून मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताचा हा जोहान्सबर्गवरील सहा कसोटी सामने आणि ३० वर्षांतील पहिला पराभव ठरला.