मुंबई : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी (५/७१) आणि ऑफ-स्पिनर हिमांशू सिंह (४/७७) यांच्या प्रभावी फिरकी माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात ओडिशाचा डावाने धुव्वा उडवत बोनस गुणाची कमाई केली. त्यामुळे एलिट ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत मुंबईने चौथ्यावरून तिसरे स्थान पटकावले आहे.

मुंबईने यंदाच्या हंगामाची सुरुवात पराभवाने केली होती. बडोद्याने मुंबईला हा धक्का दिला होता. त्यानंतरच्या तीन सामन्यांत मात्र मुंबईला गुण कमावण्यात यश आले आहे. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ शरद पवार क्रिकेट अकादमी या आपल्या घरच्या मैदानावर झालेले दोनही सामने मुंबईने जिंकले आहेत. या मैदानावर मुंबईने याआधी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्राला नमवले होते. त्या वेळी धावांचा पाठलाग करताना एक गडी गमावल्याने मुंबईच्या हातून बोनस गुण निसटला होता. मात्र, पुन्हा हीच चूक ओडिशाविरुद्ध होणार नाही याची मुंबईने काळजी घेतली.

हेही वाचा >>>Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार

अनुभवी फिरकीपटू मुलानीने पहिल्या डावात पाच, तर दुसऱ्या डावात सहा असे एकूण ११ गडी बाद केले. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मुलानीला उंचपुरा ऑफ-स्पिनर हिमांशूची मोलाची साथ लाभली. त्याने दोन डावांत मिळून सात बळी मिळवले.

मुंबईने पहिल्या डावात ६०२ धावांचा डोंगर उभारून विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले होते. श्रेयस अय्यर (२३३ धावा), सिद्धेश लाड (नाबाद १६९), अंगक्रिश रघुवंशी (९२) आणि सूर्यांश शेडगे (नाबाद ७९) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. याच्या प्रत्युत्तरात ओडिशाचा पहिला डाव २८५ धावांत आटोपल्याने त्यांना मुंबईने ‘फॉलोऑन’ दिला. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर ओडिशाची ५ बाद १२६ अशी स्थिती होती. चौथ्या दिवशी ओडिशाच्या फलंदाजांनी साधारण दोन तास प्रतिकार करत मुंबईचा विजय लांबवला. अखेरीस त्यांचा डाव २१४ धावांवर संपुष्टात आला आणि मुंबईने हंगामातील दुसरा विजय साकारला.

हेही वाचा >>>घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी

ओडिशाविरुद्ध बोनस गुणासह विजय साकारल्याने मुंबईचा संघ एलिट ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईच्या खात्यावर आता १६ गुण झाले आहेत. बडोद्याचा संघ (१९ गुण) अग्रस्थानी कायम असून जम्मू-काश्मीर (१७ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. सेनादलाविरुद्धच्या पराभवामुळे महाराष्ट्राची (८ गुण) सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

संक्षिप्त धावफलक

● मुंबई (पहिला डाव) : ४ बाद ६०२ घोषित

● ओडिशा (पहिला डाव) : २८५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● ओडिशा (दुसरा डाव) : ७२.५ षटकांत सर्व बाद २१४ (आशीर्वाद स्वेन ५१, कार्तिक बिस्वाल नाबाद ४५; शम्स मुलानी ५/७१, हिमांशू सिंह ४/७७)