Ricky Ponting’s big prediction on Ajinkya Rahane’s Test career: लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला आपल्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या खेळीच्या जोरावर २९६ धावा करता आल्या. ५१२ दिवसांनंतर संघात पुनरागमन करताना अजिंक्य रहाणे पहिल्या डावात महत्त्वाची भूमिका बजावली. आता अजिंक्य रहाणेच्या कसोटी कारकिर्दीबाबत रिकी पाँटिंगने एक मोठे भाकीत केले आहे.

अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात टीम इंडियासाठी सर्वाधिक ८९ धावा केल्या होत्या, पण रहाणेच्या या उत्कृष्ट फलंदाजीनंतर श्रेयस अय्यर संघात परतल्यावर तो भारतीय संघात असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर कांगारूंचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने रहाणेला भारतीय कसोटी संघात स्थान मिळेल की नाही हे भाकित केले.

आयसीसीशी बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला की, रहाणेने मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आणि तुम्ही एवढेच करू शकता. मला वाटतं केएल राहुल आणि श्रेयस अय्यर भारतीय कसोटी संघात परत येईपर्यंत भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या दोन कसोटींमुळे त्याला त्याची कसोटी कारकीर्द आणखी काही वर्षे लांबवण्याची मोठी संधी मिळाली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “देव अक्कल वाटत होता तेव्हा…”; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची राहुल द्रविडवर सडकून टीका

अजिंक्य एक सर्वात शिस्तप्रिय क्रिकेटर –

रहाणे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला असून रिकी पाँटिंग या संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. रिकी म्हणाला की तो खूप नम्र आहे आणि मी ज्यांच्यासोबत काम केले आहे, त्यापैकी एक सर्वात शिस्तप्रिय क्रिकेटर आहे. तो सराव सत्रात सर्वात पहिल्यांदा पोहोचणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक आहे. तो रिकव्हरी आणिल रिहॅबसाठी जिममध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक आहे. रिकी म्हणाला की, रहाणेला कसोटी फॉर्मेटमध्ये खेळताना पाहून मला खूप आनंद होतो आणि जेव्हा तुम्ही त्याला (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) अशा प्रकारे खेळताना पाहता, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो गेल्या काही वर्षांपासून या भारतीय संघात का नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाँटिंग म्हणाला की आधुनिक खेळात आयपीएलमधील काही चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय कसोटी संघात परतला आणि खूप चांगला खेळला हे आश्चर्यकारक नाही. दुसरीकडे, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात आल्यावर रहाणेचे काय होईल, रिकी म्हणाला की मी भाग्यवान आहे की मी भारतीय क्रिकेट संघाचा निवडकर्ता नाही. कारण हा निर्णय खूप कठीण असेल. कदाचित निवड ही परिस्थितीचा आधार असू शकते, परंतु रहाणे लयीत आहे हे भारतासाठी चांगले आहे