Riyan Parag Statement: रियान पराग क्रिकेटशिवाय त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. रियान परागने टी-२० वर्ल्ड कपवर मोठे वक्तव्य केले आहे. रियान परागला सध्या सुरू असलेल्या टी-२०विश्वचषक स्पर्धेतील टॉप चार संघांचा अंदाज वर्तवण्यास विचारले असता, त्याने वेगळीच प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की मला ही स्पर्धा पाहण्यात रस नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओ क्लिपमध्ये रियान परागने सांगितले की, जेव्हा तो स्वत: विश्वचषक खेळेल तेव्हा तो पहिल्या चार संघांचा विचार करेल. द भारत आर्मीसोबतच्या संभाषणात रियान पराग म्हणाला, ‘टॉप चार संघ कोण असतील हे सांगणं एक पक्षपाती उत्तर असेल, पण खरे सांगायचे तर मला वर्ल्ड कपही बघायचा नाही. शेवटी कोण जिंकते ते मी बघेन आणि त्याचा मला आनंद होईल. जेव्हा मी विश्वचषक खेळेन, तेव्हा मी अव्वल चार आणि या सर्वांचा विचार करेन’

हेही वाचा – T20 WC 2024: वर्ल्डकपमध्ये सुपर ओव्हरचा थरार; डेव्हिड व्हिसा ठरला नामिबियाच्या विजयाचा शिल्पकार

अलीकडेच परागने भारतीय संघाकडून खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते, काहीही झाले तरी तो एक दिवस भारतासाठी खेळणार आहे. पराग पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता, ‘एखाद्या वेळी तुम्हाला मला सोबत घेऊन जावे लागेलच, बरोबर? त्यामुळे मी भारताकडून खेळणार आहे, हा माझा विश्वास आहे. कधी याची मला पर्वा नाही.’

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, पंड्याच्या बायकोने इन्स्टाग्रामवर पुन्हा केला बदल, ‘ते’ फोटो…

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी होणार निवड?

आसामच्या २२ वर्षीय रियान परागने यंदा आयपीएल २०२४ मध्ये आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला. रियानने १५० च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या. गेल्या दोन हंगामात राजस्थानकडून खेळताना रियान पराग फ्लॉप ठरला होता. २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा पराग गेल्या पाच हंगामात काही विशेष करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून फक्त १६०, ८६, ९३, १८३, ७८ धावा आल्या. पण यंदा त्याने सराव करत केलेली चांगली कामगिरी पाहता त्याची भारताच्या टी-२० संघात निवड होण्याची दाट शक्यता आहे. अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा यांच्यासह टी-२० विश्वचषकानंतर होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे.