Rohit Sharma World Record: टी-२० विश्वचषक २०२४ च्या भारताच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी आणि रोहित-पंतची फटकेबाजी यासह आयर्लंडवर टीम इंडियाने ८ विकेट्स आणि ४६ चेंडू राखून मोठा विजय मिळवला. रोहित शर्माने भारताच्या पहिल्याच सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. पण या अर्धशतकासह रोहित शर्माने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

टी-२० विश्वचषक २०२४ च्या भारतीय संघाच्या पहिल्याच सामन्यात रोहितने ३ षटकार मारून ऐतिहासिक विक्रम केला आहे. षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा आकडा गाठला आहे, ज्याच्या जवळपास दुसरा कोणीही फलंदाज नाही.

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकात खेळत आहे. रोहित शर्माने या सामन्यात तीन षटकार मारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० षटकार पूर्ण केले आहेत. त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला ६०० षटकार लगावता आलेले नव्हते. त्याचबरोबर ख्रिस गेल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकार मारले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी:
रोहित शर्मा- ६०० षटकार

ख्रिस गेल- ५५३ षटकार
शाहिद आफ्रिदी- ४७६ षटकार
ब्रेंडन मॅक्युलम- ३९८ षटकार
मार्टिन गप्टिल- ३८३ षटकार

टी-२० क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण

आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात २६ धावा करत रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो विराट कोहली आणि बाबर आझमनंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या टी-२० क्रिकेटमध्ये ४०३८ धावा आहेत, तर बाबर आझमने टी-२० मध्ये एकूण ४०२३ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आपल्या १५२व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर रोहितने सर्वात कमी चेंडू खेळून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने २८६१ चेंडूत ४००० धावांचा टप्पा गाठला आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये गाठला हा टप्पा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कपमध्ये १००० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी भारतीय खेळाडू विराट कोहली आणि श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धने यांनी ही कामगिरी केली होती. विराट कोहलीने टी-२० क्रिकेट विश्वचषकात आतापर्यंत ११४२ धावा केल्या आहेत तर महेला जयवर्धनेने टी-२० विश्वचषकात १०१६ धावा केल्या आहेत. आयर्लंडविरूद्ध सामन्यात त्याने अर्धशतकाचा टप्पाही पार केला. रोहितचे हे टी-२० विश्वचषकातील हे १० वे अर्धशतक आहे. यासह, तो टी-२० विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. विराट कोहली १४ अर्धशतकांसह आघाडीवर आहे.