Sourav Ganguly Advice To Team India: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने सुरुवातीच्या दोन दिवसात इंग्लंडच्या खेळाडूंना चांगलाच घाम फोडला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंतने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला. तर गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने इंग्लंडला तीन मोठे धक्के दिले आहेत. त्यामुळे सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकला आहे. दरम्यान भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गिल अँड कंपनीला मोलाचा सल्ला दिला आहे.
सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला देत म्हटले की, ” भारतीय संघाने या दमदार सुरुवातीचा फायदा घ्यायला हवा आणि सामना जिंकायला हवा. कारण इंग्लंडमध्ये अशी संधी मिळत नाही. हेडिंग्लेच्या मैदानावरील खेळपट्टी इतकी कोरडी असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. भारतीय संघ जर ६०० धावांच्या जवळ पोहोचला असता आणि चेंडू खाली वर राहत असेल तर इंग्लंडचे फलंदाज अडचणीत येऊ शकतात. भारताने अजूनही ही कसोटी जिंकायला हवी.”
या सामन्यासाठी युवा फलंदाज साई सुदर्शनला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. तर करुण नायरने ८ वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. सौरव गांगुलींच्या मते, अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये स्थान द्यायला हवं होतं. इंग्लंडमध्ये डावखुऱ्या हाताचा गोलंदाज संघात असणं नेहमी फायदेशीर ठरतं, असं सौरव गांगुली म्हणाले.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने १०१ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ४२ धावांची खेळी केली. या सामन्यात कर्णधार आणि उपकर्णधाराची बॅट चांगलीच तळपली. शुबमन गिलने १४७ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने १३४ धावांची खेळी केली.