बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. सुशांतने या जगाचा निरोप घेतला असला तरी आजही तो आठवणींच्या रुपात चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. चित्रपटांच्या प्रवासातही सुशांतचा क्रिकेटशी जुना संबंध होता. मोठ्या पडद्यावरील त्याचा प्रवास एका क्रिकेटपटूच्या भूमिकेने सुरू झाला. यानंतर त्याने भारताचा दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या पुस्तकावर आधारित ‘का पो छे’ या चित्रपटात सुशांतने क्रिकेटर आणि प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटात त्याने अलीची भूमिका साकारणाऱ्या दिग्विजय देशमुखला क्रिकेटचे धडे दिले होते. आता खऱ्या आयुष्यात दिग्विजय मैदानावर अप्रतिम कामगिरी करत आहे. हेही वाचा - ‘सुपर’ जाफर..! नाना पाटेकरला सोबत घेत इंग्लंडच्या माजी कर्णधाराची केली बोलती बंद! दिग्विजयचे पदार्पण दिग्विजयने २०१९मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीद्वारे टी-२०मध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याने रणजी करंडकातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये आयपीएलच्या १३व्या मोसमाच्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या गोटात सामील केले. दिग्विजयने प्रथम श्रेणी सामन्यात ६ बळी आणि ७ टी-२० सामन्यात ९ बळी मिळवले आहेत. सुशांतच्या निधनानंतर दिग्विजय प्रतिक्रिया दिली होती. ''सुशांत दादा सर्वात चांगल्या माणसांपैकी एक होता. 'काय पो छे' चित्रपटात त्याने माझ्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. तो एक चांगला क्रिकेटपटू होता. सुशांतने मला मोठे झाल्यावर कोण होणार, असे विचारले होते. तेव्हा मी त्याला उत्तरात 'क्रिकेटर' म्हणून सांगितले. क्रिकेटमध्ये काहीतरी केल्यानंतर भेटेन असे त्याला मी सांगितले होते, पण ती इच्छा अपूर्ण राहिली'', असे दिग्विजय म्हणाला होता. हेही वाचा – अस्सं आहे तर..! शुबमन गिल आणि लाल रुमालाचं ‘कनेक्शन’ तुम्हाला माहीत आहे का? सुशांतच्या मृत्यूमुळे हादरले होते बॉलिवूड १४ जून २०२० रोजी सुशांत सिंगने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. राहत्या घरात मृतदेह आढळून आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे, असेही मुंबई पोलिसांनी नोंदवले होते.