टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने उपांत्य फेरीचा मार्गही बिकट झाला आहे. माजी क्रिकेटपटूही टीम इंडियाच्या कामगिरीवर निराश आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआयला मोलाचा सल्ला दिला आहे. दिग्गज खेळाडूंची कामगिरी चांगली नसेल तर तरुणांना संधी द्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे

“जर वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही दुसऱ्या संघांवर अवलंबून राहात असू, तर लाज वाटली पाहीजे. जर वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर आपल्या ताकदीवर उपांत्य फेरी गाठली पाहीजे. दुसऱ्या संघांवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. टीम व्यवस्थापक आणि निवडकर्त्यांनी दिग्गज खेळाडूंचा भविष्य ठरवलं पाहीजे”, असं माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितलं. “बीसीसीआयला हा विचार करणं गरजेचं आहे की, तरुण खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे. पुढची पिढी घडवण्यासाठी आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आमचे तरुण खेळाडू पराभूत होत असतील तर यात काही चुकीचं नाही. त्यांना अनुभव मिळेल. पण दिग्गज खेळाडू प्रदर्शन करत नसतील तर आपण खूपच खराब क्रिकेट खेळत आहोत. यावर टीका होणारच आहे. मला वाटत बीसीसीआयने यात हस्तक्षेप करावा आणि युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचा विचार करावा.”, असंही कपिल देव यांनी पुढे सांगितलं.

T20 WC: “खराब कामगिरीचा आयपीएलशी काय संबध?”; गौतम गंभीर भडकला

भारतीय संघात असलेल्या दिग्गज खेळाडूंमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत यांची कामगिरी साजेशी झालेली नाही. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, मात्र न्यूझीलंडविरुद्ध धावा करण्यात अपयशी ठरला.