टी २० वर्ल्डकपमध्ये विराट कोहली कर्णधार म्हणून नामिबियाविरुद्ध शेवटचा सामना आहे. यानंतर टीम इंडियाचा टी २० साठी कर्णधार कोण असेल? याबाबत खलबतं सुरु आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विराट कोहलीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यानंतर विराट कोहलीने पुढचा कर्णधारबाबत संकेत दिले. “मला कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली, मी ही जबाबदारी पूर्ण करण्याचं काम केलं. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता पुढे काम करण्याची गरज आहे. टीम इंडियाने जसं काम केलं, त्यावर अभिमान वाटत आहे”, असं विराट कोहलीने सांगितलं आणि रोहित शर्माचं नाव घेतलं.

“येणाऱ्या काळात ग्रुपची जबाबदारी आहे की, संघाला पुढे घेऊन जायचं आहे. रोहित शर्मा पण इथे आहे. तो काही दिवसांपासून सर्व गोष्टी बघत आहे. तसेच टीममध्ये काही लीडर्स आहेत. अशात भारतीय संघाला येणारा काळ चांगला असणार आहे”, असं विराट कोहलीने सांगितलं. टी २० वर्ल्डकपनंतर बीसीसीआय टी २० साठी नव्या कर्णधाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचं नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. विराट कोहलीकडून एकदिवसीय सामन्याचं नेतृत्वही घेतलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हाइट बॉलसाठी एकच कर्णधार असेल. तर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे.

T20 WC: कर्णधारपदाच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीला नशिबाची साथ; नामिबिया विरुद्ध…

टी २० वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. कर्णधार म्हणून नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना असून आतापर्यंत एकूण ५० सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. विराट कोहलीसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून रवि शास्त्री यांचा शेवटचा सामना आहे. टी २० वर्ल्डकपनंतर माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.