टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. युएईच्या खेळपट्ट्यांवर वरुण चक्रवर्तीपासून रविचंद्रन अश्विनला काही खास कामगिरी करता आली नाही. त्याचवेळी राहुल चहरला विश्वचषकात केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. कर्णधार विराट कोहलीचे ट्रंप कार्ड असलेल्या युझवेंद्र चहलला यामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यूएईमध्ये आयपीएलच्या सामन्यांमध्ये चहलने दमदार कामगिरी करत आपली दावेदारी मांडली होती, मात्र निवड समिती आपल्या जिद्दीवर ठाम राहिली. त्यानंतर आता एवढ्या मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आल्याने चहलने मौन सोडले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल पहिल्यांदाच संघातून बाहेर पडल्याबद्दल उघडपणे बोलला आहे. “गेल्या चार वर्षांत मला बाजूला बसवण्यात आले नाही आणि मग अचानक मला इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी संघातून वगळण्यात आले. मला खूप वाईट वाटलं. पण, त्यानंतर मला माहित होते की आयपीएलचा दुसरा टप्पा आता जवळ येणार आहे. मी माझ्या प्रशिक्षकांकडे गेलो आणि त्यांच्याशी खूप बोललो. माझी पत्नी आणि कुटुंबीयांनी मला सतत प्रोत्साहन दिले. माझ्या चाहत्यांनी सतत प्रेरणादायी पोस्ट शेअर केल्या ज्यामुळे मला बळ मिळाले. मी माझ्या ताकदीचा आधार घेतला आणि या गोंधळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी जास्त काळ रागावू शकत नाही कारण त्याचा माझ्या आयपीएल फॉर्मवर परिणाम झाला असता,” असे चहलने म्हटले आहे.

चहलने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली होती. चहलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आठ सामन्यात १४ विकेट्ससह प्लेऑफमध्ये पोहोचण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी चहलचे संघात पुनरागमन झाले आहे. कोहलीने अचानक क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा या मालिकेतून टी २० कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. त्याच वेळी, राहुल द्रविड देखील या मालिकेसह नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युझवेंद्र चहल हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या जवळचा खेळाडू मानला जातो. दोघेही आरसीबीमध्ये एकत्र खेळतात, त्यामुळे त्यांच्यात चांगली बॉन्डिंग आहे. निवडकर्त्यांनी युझवेंद्र चहलला टी-२० विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. टी २० विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी युझवेंद्र चहलला वगळून राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांसारख्या फिरकीपटूंना संधी दिली होती.