|| ऋषिकेश बामणे

मुंबई : धरमवीर पाल, सुधीर गौतम, राम बाबू यांच्यासारख्या भारतीय क्रिकेटपटूंचे तारांकित चाहते सर्वश्रुतच आहेत. यात आता कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांचीसुद्धा भर पडली आहे. सांताक्रूझला राहणाऱ्या २३ वर्षीय चिराग खिलारेने सुरुवातीच्या काळातील कुटुंबीयांच्या विरोधाचे अनुकूलतेत परावर्तन करून विराटविषयीचे प्रेम जोपासले आहे. एक दिवस विराटची भेट होईल, या आशेने तो गेली सात वर्षे मुंबईतील त्याच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय किंवा ‘आयपीएल’ सामन्यांना हजेरी लावतो आहे.

कोहलीच्या नेतृत्वाखाली जेव्हा २००८मध्ये भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले, तेव्हापासूनच चिरागला कोहली एक फलंदाज आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आवडू लागला. २०११मध्ये अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चिरागने प्रथमच कोहलीला ‘याचि देही, याचि डोळा’ खेळताना पाहिले. त्या वेळी शालेय शिक्षण घेणाऱ्या चिरागला पुढे जाऊन आपल्या आयुष्यात कोहलीचे स्थान इतके महत्त्वाचे होईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र २८ फेब्रुवारी, २०१२ रोजी कोहलीने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची यथेच्छ धुलाई करून भारताला श्रीलंकेवर अशक्यप्राय विजय मिळवून दिल्यामुळे चिरागने मुंबईत होणाऱ्या त्याच्या प्रत्येक सामन्याला स्टेडियम गाठायचे, असा निर्धार केला.

या खडतर आव्हानाविषयी चिराग म्हणाला, ‘‘भारताचा मुंबईत खेळला जाणारा प्रत्येक सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी मी फार आतुर व्हायचो. कारण यामुळे मला कोहलीला जवळून पाहण्याची संधी मिळायची. परंतु आई-वडिलांनी त्या वेळी पाठिंबा न दिल्यामुळे मला माझी आवड जोपासणे कठीण गेले. मध्यमवर्गीय कुटुंबातील एका १६-१७ वर्षांच्या मुलाने क्रिकेट सामना पाहण्यासाठी दोन-तीन हजार रुपये खर्च करावे, हे कोणत्याही पालकांना चुकीचेच वाटणार.’’

चिरागने हार न मानता कुटुंबीयांना आपली भूमिका पटवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेरीस २०१३मध्ये त्याच्या प्रयत्नांना यश आले. तेव्हापासून प्रत्येक सामन्याच्या आदल्या दिवशी तो कोहलीचे नाव असलेले तिरंगी टी-शर्ट परिधान करून खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी स्टेडियममध्ये येतो. त्याशिवाय प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी तो चेहऱ्याला रंग करून केशरचनाही कोहलीसारखी करतो. काही दिवसांपूर्वीच केशरचनेद्वारे कोहलीचा चेहरा डोक्याच्या मागील बाजूस कोरून घेतल्याचे छायाचित्र त्याने ‘इन्स्ट्राग्राम’वर पोस्ट केले होते.

सध्या एका जाहिरात कंपनीत ‘डिजिटल मार्केटिंग व्यवस्थापक’ म्हणून कार्यरत असणारा चिराग स्वत:च सर्व सामन्यांचा खर्च करतो. त्याचप्रमाणे ‘आयपीएल’मध्येही तो मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्याऐवजी कोहलीच्या ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु’च्या नावाचा जयघोष करतो. मंगळवारी चिराग पुन्हा एकदा कोहलीची भेट घेण्याचे स्वप्न बाळगून भारताचा तिरंगा डौलाने फडकावण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे.