World Cup 2023 : विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताचे आतापर्यत चार सामने झाले आहेत. हे चारही सामने भारताने जिंकले आहेत. टीम इंडिया पुढच्या सामन्यांमध्येही अशीच खेळत राहिली तर भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं मानलं जात आहे. भारताचा पाचवा सामने न्यूझीलंडविरोधात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी, १९ ऑक्टोबर रोजी भारताचा चौथा सामना खेळवण्यात आला. भारताने या सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केला. या सामन्यानंतर भारताचा सलामीवीर शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने काहीवेळी कॅमेऱ्यासमोर बातचीत केली. परंतु, यावेळी शुबमन गिलने रोहित शर्माला असा प्रश्न विचारला की ज्याने रोहित शर्मा दुःखी झाला. त्यानंतर त्याने शुबमनच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील १७ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने बांगलादेशवर ७ गडी आणि ५१ चेंडू राखून मात केली. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २५६ धावांचा डोंगर उभारला होता. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर ४१.३ षटकांत बांगलादेशचं आव्हान पूर्ण केलं. विराटआधी कर्णधार रोहित शर्मा याने झटपट ४८ धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. परंतु, एक चुकीचा फटका खेळून रोहित बाद झाला. याबाबत शुबमन गिलने सामना संपल्यावर रोहित शर्माला प्रश्न विाचारला.

हे ही वाचा >> Virat Kohli: ‘त्याने जे केले त्यात चूक काय?’; शतकानंतर विराटला ट्रोल करणाऱ्यांना माजी दिग्गज क्रिकेटपटूने दिले चोख प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित ४८ धावांवर खेळत असताना (१३ व्या षटकात) त्याने हसन मेहमुदच्या गोलंदाजीवर एक पुल शॉट लगावला. परंतु, सीमारेषेवर तोव्हिद हृदोयने त्याचा झेल टिपला. पुल शॉट ही रोहितची सर्वात मोठी ताकद आहे. पंरतु, रोहित त्याच्या आवडत्या शॉटवरच बाद झाला. यावर शुबमन गिलने रोहितला विचारलं, रोहितदादा, तू बाद झाल्यावर तुला कसं वाटलं? तू फटका लगावताना तुझी बॅट खालच्या बाजूला का वळवलीस? तू तो पुल शॉट वरच्या दिशेने का खेळला नाहीस? यावर रोहित शर्मा म्हणाला, मी का रागावेन? मी चूक केली. मी तो फटका वरच्या दिशेनेच खेळायला पाहिजे होता.