जगभरातील आरोग्य तज्ज्ञांसाठी आनंद साजरा करावा अशी सुखद बातमी आहे. संयुक्त राष्टसंघाने जाहीर केलेल्या अहवालानुसार जगभरात गर्भवतींचे मृत्यूचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हटले आहे.
याआधी १९९० सालच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या ५.२ लाख गर्भवतींच्या मृत्यूची संख्या कमी होऊन २०१३ साली २.८९ लाख इतकी झाली आहे. १९९० साली गर्भवतींच्या मृत्यूचे गुणोत्तर (एमएमआर) ३८० इतके होते. यावेळी २०१३ सालात हेच प्रमाण २१० इतके नमूद झाले आहे. यावरून गर्भवतींच्या मृत्यू प्रमाणात लक्षणीयरित्या घट झाल्याचे समोर आले आहे. परंतु, भारताच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही कमी होणे गरजेचे आहे. या अहवालात गर्भवतींच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी अत्यंत काळजी घेण्याची गरज असलेल्या देशांमध्ये भारत, नायजेरीया यांचा समावेश करण्यात आला आहे. २०१३ साली भारतात ५०,००० गर्भवतींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. हेच नायजेरीयात ४०,००० गर्भवतींचा २०१३ सालात मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.