शरीर सर्वाधिक तंदुरुस्त असते ते तरुण वयात. त्यामुळे या वयात शारीरिक व्याधींचा त्रास होत नसल्याचे मानले जात असले तरी सध्या ही परिस्थिती राहिलेली नाही. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि त्या बरोबरच कामातील प्रमाणाबाहेर वाढलेल्या ताणामुळे काही प्राणघातक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मेंदूतील रक्तस्रवासारख्या प्राणघातक आजाराने होणा-या मृत्यूंची संख्या वाढत आहे आणि त्यातही चिंताजनक बाब म्हणजे २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंदूतील रक्तस्रवाचा विकार यापूर्वी उच्च रक्तदाब असलेल्या जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये दिसून येत होता, पण आता हे प्रमाण तरुणांमध्ये जास्त दिसू लागले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे तरुण वयात मेंदूघात होत असल्याचे आढळले आहे. सध्या तरुणांची लाईफस्टाईल बदलल्याने हे प्रमाण वाढत आहे.
भारतात एक लाख रुग्णांमागे १०० ते १५० जणांना पक्षाघात होतो. म्हणजेच त्यांच्या एकूण संख्येचा विचार करायचा झाला तर ही संख्या देशाच्या लोकसंख्येमध्ये १० ते १५ लाख असू शकेल. यापैकी १५ ते २० टक्के रुग्ण हे ३० वर्षापेक्षा कमी वयाचे असतात. सध्या तरुणांना वेळी-अवेळी काम, कामाचा जबरदस्त तणाव, स्पर्धात्मक वातावरण, अपुरी झोप, खाण्याच्या बदललेल्या वेळा, व्यायाम न करणे आणि आनुवंशिकपणामुळे या विकाराचा धोका वाढला आहे.