उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक वेळा घशाला कोरड पडते किंवा शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. परंतु, पाण्यासोबतच अशा काही भाज्या आणि फळे आहेत ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते. यातलीच एक फळभाजी म्हणजे काकडी. काकडीमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा डॉक्टर काकडी खाण्याचा सल्ला देतात. परंतु, पाण्याची कमतरता भरुन काढण्यासोबतच काकडीचे अन्यही काही फायदे आहेत ते जाणून घेऊ.
काकडी खाण्याचे फायदे
१. अपचन, उलटी, मळमळ, पोटात गुब्बारा धरणे यावर गुणकारी
२. पोटाला थंडावा मिळतो.
३. भूक मंदावली असल्यास काकडीचे काप करुन त्यावर पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत.
४. डोळ्याखाली काळी वर्तुळे आल्यास काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावे.
५. चेहऱ्यावरील डाग किंवा काळपटपणा दूर करायचा असल्यास काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा.
६. चटका बसल्यास किंवा भाजल्यास त्यावर काकडीचा रस लावावा.
७. काकडी रोज खाल्ल्यामुळे पोट साफ होते.
८. आम्लपित्त, गॅसेस व आंत्रव्रण (अल्सर) यांसारखे विकार असल्यास काकडीचा कीस किंवा काकडीचा रस दर २-४ तासांनी प्यावा. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.
९. काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमे, पुटकुळ्या, सुरुकुत्या दूर होतात.
१०. काकडीचा रस केसांना लावल्यास त्यामध्ये असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळे केस गळायचे थांबतात.
काकडी कधी आणि कोणी खाऊ नये?
१. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शक्यतो काकडी प्रमाणात खावी.
२. सर्दी किंवा कफजन्य समस्या असल्यास काकडी खाऊ नये.
( कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)