Health Special वृ्द्धापकाळातील सगळ्या बदलांची व्याप्ती मोठी आणि त्यांचे परिणामही अनेक. त्यामुळेच बरेच वेळा एखाद्या वृद्ध व्यक्तीमध्ये होणारे बदल हे स्वाभाविक असतात, ते वयोमानानुसारच आहेत असे कुटुंबीयांना वाटते. परंतु सगळेच काही नॉर्मल नसते. हळू हळू घडणारे बदल कधीकधी तीव्र होतात, त्यांचे स्वरूप बदलते. शारीरिक विकार, वृद्धापकाळात होणारे मानसिक बदल आणि कमी होत जाणाऱ्या बौद्धिक क्षमता या सगळ्याकडे सजगपणे पाहावे लागते. जेव्हा बौद्धिक क्षमतांचा ऱ्हास होऊ लागतो, म्हणजे विस्मरण होऊ लागते, भाषेवर परिणाम होतो, निर्णयक्षमता कमी होते, हिशोब चुकू लागतात, दिशांचे भान राहात नाही, एखादी कृती नियोजनपूर्वक पार पाडता येत नाही; तेव्हा त्या व्यक्तीस स्मृतिभ्रंश (Dementia) झाला असे म्हणतात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसे वय वाढते, तसे शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडतात, हे आपण सर्व जाणतोच. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या, दात पडू लागले, केस पांढरे झाले, दृष्टी मोतिबिंदूमुळे अधू होऊ लागली की, सर्वसामान्यपणे वय होऊ लागले असे मनात येऊन जाते. या बाह्य बदलांबरोबरच शरीर क्रियांवरही परिणाम होतो. नेहमीची कामे करण्याचासुद्धा वेग कमी होतो, इंद्रियांची संवेदनशीलता कमी होऊ लागते. अनेक कामे एकाच वेळेस करण्याची क्षमता कमी होते. काही प्रमाणात गोष्टी विसरायला होते, नवीन गोष्टी उदा. कॉम्प्युटर, शिकणे कठीण होते. अनेक व्याधी जडतात ते वेगळेच. उच्च रक्तदाब (hypertension), मधुमेह (diabetes mellitus), हृदयविकार (Heart disease), संधिवात (osteoarthritis), पक्षाघात (paralysis/ hemiplegia/ stroke), कंपवात (Parkinson’s disease) हे त्यापैकी काही…

हेही वाचा…‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!

बौद्धिक क्षमतांबरोबरच स्वभावामध्येही बदल होतो. दैनंदिन जीवनावर व दिनक्रमावर परिणाम होतो, उदा. एकट्याने प्रवास करणे, आर्थिक व्यवहार करणे, स्वयंपाक करणे, तसेच जेवणे, कपडे घालणे, आंघोळ करणे आदी. शरदराव बाजारात भाजी आणायला गेले होते. बराच वेळ झाला, तरी घरी परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा त्यांना शोधायला घराबाहेर पडला. तो कोपऱ्यावर पोहचतो न पोहचतो तोच शेजारच्या बिल्डिंग मधला मित्र त्यांना घेऊन येताना दिसला. तो म्हणाला, “अरे, काका मला पार पुलापलीकडे भेटले! गोंधळलेले दिसले. आपण कुठे आहोत, याचे त्यांना भान नव्हते.

भाजीची पिशवी रिकामीच होती”… गेल्या दोन महिन्यात असे दुसऱ्यांदा घडले होते. घरच्यांना काळजी वाटू लागली आणि ते डॉक्टरांकडे गेले.

“अरे, वर्षानुवर्षे मी स्वेटर विणत आले, पण आज मला काही केल्या जमेना. सतत चुका झाल्या. टाके मोजायला चुकले, वीण चुकली आणि सगळे उसवून टाकावे लागले”, आई मोठ्या खेदाने सांगत होती. डॉक्टरांकडे नेले, त्यांच्याकडे गेल्यावर सुरुवातीला त्यांनी समजूत काढली, “अहो, वयाप्रमाणे असे व्हायचेच”. तीन महिन्यांनी आईला डॉक्टरांकडे पुन्हा न्यायची वेळ आली, कारण आईच्या वारंवार स्वयंपाकात चुका होऊ लागल्या. इतकेच नाही तर ती औषधे घ्यायला विसरू लागली आणि काही वेळेस तर जेवायलाच विसरू लागली…

हेही वाचा…तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….

माधवराव रिटायर होऊन वर्ष ही झाले नव्हते पण हल्ली त्यांचा पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. घरातून बाहेर पडेनासे झाले होते. एकटे बसून राहायचे. टीव्ही पाहणेही कमी केले होते. त्यांच्या पत्नीला वाटे आता तर खरे एकमेकांच्या सहवासात मजेत दिवस घालवायचे तर असे काय हे करतात? हळूहळू माधवरावांच्या हातापायला कंप सुटू लागला. चेहेऱ्यावरचे भावच नाहीसे झाले. हालचाली अतिशय हळू झाल्या. कंपवाताचे (Parkinson’s disease) निदानझाले. काही महिन्यांनी अनेक गोष्टी ते विसरू लागले… परंतु तरीही हळूहळू चालत अनेक वर्षांच्या शिरस्त्याप्रमाणे कोपऱ्यावरच्या दुकानातून दूध आणि समोरून वृत्तपत्र न चुकता विकत आणत. त्यांच्या पत्नीला त्यांच्या विकारामुळे काळजी वाटे. एक दिवस आपल्या घरी न जाता ते वरच्या मजल्यावर गेले आणि गोंधळून उभे राहिले. आता मात्र पुन्हा एकदा अनेक तपासण्या करण्याची वेळ आली होती…

हेही वाचा…मेंढी आणि शेळीच्या चीजबद्दल कधी ऐकलंय का? दररोज करू शकता सेवन; फायदे, तोटे सांगत तज्ज्ञांनी दिले उत्तर

वरील तीनही उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या रक्ताच्या तपासण्या आणि CT Scan/ MRI केल्यानंतर डिमेन्शियाचे (Dementia) निदान झाले व योग्य ते उपचार सुरू झाले. डॉक्टरांच्याकडे एक ७५ वर्षांचे गृहस्थ आले. “डॉक्टर, हल्ली मी फार विसरतो. काल घडलेली गोष्ट आज लक्षात राहात नाही. तीन गोष्टी आणायला बाजारात जातो आणि एकच घेऊन परत येतो. परवा तर बँकेत गेलो आणि लक्षात आले चेकबुकच आणले नाही. माझी स्मरणशक्ती तपासून पहा. बाकी मी पूर्णपणे व्यवस्थित आहे. पण मला मनात भीती वाटते की, आपल्याला Dementia तर झालेला नाही ना? माझ्या चुलत भावाला dementia झालेला मी पाहिला आहे.” डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि खरोखरच स्मरणशक्तीच्या चाचण्या, रक्ताच्या तपासण्या आणि MRI Scan करून घेतला. डिमेन्शियाचे तर निदान झाले नाही परंतु ‘सौम्य बौद्धिक ऱ्हास’ (Mild Cognitive Impairment) असल्याचे लक्षात आले. दर सहा महिन्यांनी तपासण्या करण्याचे ठरले. अशी विविध लक्षणे घेऊन आपल्यासमोर येणारा स्मृतिभ्रंश. त्याच्या विषयीची अधिक माहिती पुढील लेखात पाहू.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special how to recognize dementia and its symptoms hldc psg
First published on: 10-05-2024 at 07:00 IST