How To Find Perfect Mango: ऐका हो, ऐका… मित्र- मैत्रिणींनो, ताई-दादांनो, ही घोषणा आहे फळांच्या राजाच्या आगमनाची. पिवळ्या धम्मक पोशाखात, केशरी फेट्यासह, गोड सुगंधी अत्तर लावून फळांचे महाराज ‘श्री आंबा’ आता घरोघरी भेटीला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत हो…. तर मंडळी आंब्यांचा सीझन सुरु झालाय. दरवर्षी गुढीपाडव्याला आमरसावर ताव मारला की खऱ्या अर्थाने आंब्याचा महिना सुरु झाला असं वाटतं. यंदाचा आंब्याचं उत्पादन भरघोस आलं असलं तरी किमती काही कमी झालेल्या नाहीत असं असतानाही आपण अगदी खिशाला कात्री लावून आंबा आणला पण तो सडकाच निघाला तर? किंवा त्याहूनही भीषण म्हणजे दिसायला, चवीला गोड फळ असूनही त्याचा नंतर आरोग्याला त्रास झाला तर? तुम्हाला घाबरवत नाहीये पण मागील काही वर्षात ऐन मोसमात सुद्धा कृत्रिम रसायने, पावडर वापरून पिकवलेले आंबे बाजारात आले आहेत. तुमच्या वाट्याला असा घातक आंबा येऊ नये यासाठी आज आपण FSSAI आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन पाहणार आहोत.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर, कृत्रिमरित्या पिकवलेली फळे मानवी वापरासाठी सुरक्षित मानली जातात. मात्र आंबा पिकवण्यासाठी वापरलेले घटक तुमच्या शरीराला किती सहन होऊ शकतात व किती सुरक्षित आहेत हे ही पाहणे आवश्यक आहे.

कॅल्शियम कार्बाइड, ज्याला ‘मसाला’ म्हणूनही ओळखले जाते हे सामान्यतः आंबे पिकवण्यासाठी वापरले जाते, मात्र FSSAI च्या प्रतिबंध आणि विक्री नियमन, २०११ च्या नियमांतर्गत याचा वापर कठोरपणे प्रतिबंधित आहे. नोडल फूड एजन्सीने सुद्धा याला अनुमोदन देत सांगितले की, अनेकदा कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याचा प्रक्रियेदरम्यान ऍसिटिलीन वायू सोडला जातो. कॅल्शियम कार्बाइड, हे हाताळणाऱ्यांसाठी तसेच ग्राहकांसाठी धोकादायक ठरते.

डॉ. संतोष पांडे, निसर्गोपचार, रेजुआ एनर्जी सेंटर, मुंबई यांनी सांगितले की, “आदर्शपणे, आंबा अंडाकृती, बीनच्या आकाराचा असावा. विशेषत: देठाभोवती वास घेतल्यावर गोड सुगंध जाणवला पाहिजे. रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांमध्ये पृष्ठभागावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे डाग असतात, तर नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यांमध्ये ते हिरवे आणि पिवळे यांचे एकसमान मिश्रण असते.”

आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला आहे की नाही हे कसे ओळखावे?

  • एक बादली पाण्यात आंबे टाका.
  • आंबे पाण्यात बुडाले तर ते नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत, असे समजा.
  • जर ते तरंगत असतील तर त्यांची कृत्रिमरीत्या पिकवले आहेत असे समजा.

डॉ पांडे सांगतात की, “कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचा रस फारच कमी असतो किंबहुना रस नसतोच, दुसरीकडे सेंद्रीय आंब्यामध्ये भरपूर ‘नैसर्गिक रस’ असतो. आणखी एक खूण म्हणजे, एकदा अर्धा कापून घेतल्यावर, आपण पाहू शकता की कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांमध्ये, सालीजवळील गराचा रंग आतील गरापेक्षा वेगळा असतो, परंतु नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंबा हा सर्वत्र एकसमान पिवळा असतो.”

हे ही वाचा<< कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी

योग्य आंबा कसा निवडायचा?

  • विश्वासार्ह्य विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.
  • फळे खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.
  • त्वचेवर काळे डाग असलेली फळे विकतघेणे टाळा कारण ही फळे कॅल्शियम कार्बाइडपासून तयार होणाऱ्या एसिटिलीन वायूमुळे पिकवली गेली असल्याची शक्यता असते.