French Diet Tips For Lose Weight : वजन कमी करण्यासाठी काही जण त्यांची दिनचर्याच पूर्णपणे बदलून टाकतात. जिमला जाण्यापासून ते अगदी खाण्या-पिण्यापर्यंतच्या सवयी बदलतात. पण, तरीही त्यांना पाहिजे तितका फरक जाणवत नाही. मग अशा वेळी नक्की वजन कसे कमी करावे हाच प्रश्न त्यांच्यासमोर सतावत असतो. पण, फ्रेंच लोक तर सगळ्या विरुद्ध गोष्टी करतात.

ब्रेड, चीज, वाइन, अगदी गोड पदार्थ आदी अनेक पदार्थ खातात, जे वजन वाढायला कारणीभूत ठरतात. तरीही त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांचे वजन कमीच असते. मग ही जादू आहे की, एक वेगळी जीवनशैली? तर याबद्दल एका फ्रेंच आरोग्य तज्ज्ञाने ‘हेल्थ हार्बर’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, “फ्रेंचमध्ये राहणाऱ्या स्त्रिया अन्न खाताना कंटाळा न करता, अगदी आनंदाने खातात. त्या जेवताना त्यांच्या पाचही इंद्रियांचा (कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा) वापर करतात. त्या कधीही कॅलरीज मोजत नाहीत. कारण- त्यांना तसे करणे कंटाळवाणे वाटते”, असे सांगितले आहे.

“फ्रेंचमध्ये राहणाऱ्या महिला हळूहळू खातात, अन्न चावताना हातातील चमचा खाली ठेवतात. म्हणजेच जर तुम्ही शांतपणे, हळुवार आणि कोणत्याही तणावाशिवाय खाद्यपदार्थांचं सेवन केलं, तर काही घासांनंतरच तुमचं मन तृप्त होतं आणि तुम्हाला जास्त खाण्याची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे कमी फॅट्स किंवा साखर नसलेले पदार्थ तेथील लोकांना आवडत नाहीत. कारण- त्यांना चव नसते. बटर, चॉकलेट, शिजवलेले पदार्थ खाणे वाईट नाही. पण, तुम्ही जर दिवसातून दोन ते तीन वेळा असे पदार्थ खात असाल, तर मग तुमच्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. त्याचप्रमाणे खाताना त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना नसते. त्यांची आहाराचं सेवन करण्याची एक नैसर्गिक लय असते, जी गोष्टी संतुलित ठेवण्यास त्यांना मदत करते. तेथील महिला जास्त जेवत नाहीत. पण, जितकंही खातात, त्याच्यातून त्यांना समाधान मिळतं. तसेच फ्रेंचमधील लोक दिवसभर खात नाहीत आणि चालणं हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे”, असे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

तर हे सगळं ऐकून दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली. “प्रत्येक वेळी खाल्ल्या जाणाऱ्या अन्न आणि पेयांचे जाणीवपूर्वक व्यवस्थापन केल्याने, शरीरात कॅलरीज कमी जातात. असं करताना आपण उपाशी आहे, असंसुद्धा वाटत नाही. त्यामुळे वजन कमी करता येतं आणि तुमचं सध्याचं वजनसुद्धा वाढत नाही. त्यामुळे फिटनेसची उद्दिष्टं साध्य करणं सोपं जातं”, असे दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डाएटिशियन दीपाली शर्मा म्हणाल्या आहेत.

शरीराला केव्हा भूक लागलीय आणि केव्हा पोट भरलंय याचे संकेत लक्षात येतात. त्यामुळे पोषक पदार्थांचे सेवन अधिक संतुलित होतं; ज्यामुळे पोषक घटकांची कमतरताही जाणवत नाही आणि अन्नाचं जास्त प्रमाणात सेवन केलं जात नाही. त्यामुळे असा चांगला परिणाम साधला जातो की, ऊर्जेची पातळी सुधारते, चांगली झोप लागते, मूड चांगला राहतो आणि मधुमेह, हृदयरोग व स्थूलता यांसारख्या जीवनशैलीच्या आजारांचा धोकासुद्धा कमी होतो, असे न्यूट्रिशनिस्ट व डाएटिशियन दीपाली शर्मा म्हणाल्या आहेत.

अन्नाचे प्रमाण मर्यादित ठेवल्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच अन्नाचे प्रमाण मर्यादित ठेवल्यामुळे शारीरिक बदलांव्यतिरिक्त अनेक लोकांना ऊर्जेची पातळी, झोप येणे व लक्ष केंद्रित होण्याची क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुमचे एकदा अन्नाशी नाते जुळले की, खाल्ल्यानंतर अपराधीपणाची भावना किंवा तणाव येत नाही. त्यामुळे आपण भूक लागली आणि कंटाळा न आल्याने मन लावून खायला (Mindful eating) शिकतो.

हळुवार खाण्याचे फायदे (French Diet Method)

दुसरीकडे हळूहळू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जेव्हा अन्न पूर्णपणे चावले जाते तेव्हा पाचक एंझाइम अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतात, ज्यामुळे आवश्यक घटकांचे चांगले शोषण होते आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीममध्ये म्हणजेच जठरांत्राच्या समस्या कमी होतात. आरामत अन्न खाल्ल्याने साखरेचे शरीरात हळूहळू आणि सातत्याने उत्सर्जन होते; ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पण, हे लक्षात ठेवा की, हळूहळू खाणे फायदेशीर असले तरी, अन्नाचे जाणीवपूर्वक हळुवार सेवन केल्याने जेवणानंतर गॅसची समस्या वाढू शकते, असे न्यूट्रिशनिस्ट डाएटिशियन दीपाली शर्मा म्हणाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या अन्नाचा रंग, वास, आवाज, त्वचा व चव या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या आणि तुमच्यासमोर ठेवलेल्या पौष्टिक जेवणाचे कौतुक करा. कोणत्याही व्यत्ययाशिवाय सेवन करण्यास सक्षम असल्याबद्दल कृतज्ञ राहा. शारीरिक असो वा भावनिक, तुम्ही खाल्लेले अन्न तुम्हाला आवडत असल्यामुळे तुमचे एक घट्ट नाते तयार होते. शारीरिक भुकेचे संकेत ऐका आणि पोट भरेपर्यंत खा. तसेच शरीराला अन्नाची खरंच गरज आहे का, की आपण भावनेच्या प्रभावामुळे खातोय हे समजून घेण्याचा सराव करा, ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळता येईल आणि तुमचे आरोग्य चांगले राहील.