सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच तोंडावर, डोळ्यांवर पाणी मारण्याची अनेकांना सवय असते. असे उठल्या उठल्या सपासप डोळ्यांवर पाणी मारण्याने अत्यंत थंडगार आणि ताजेतवाने वाटते नाही का? मात्र, तुम्हाला हे सवयीचे असल्यास ती एक ‘वाईट सवय’ असल्याचे लेसिक व मोतीबिंदूचे सर्जन, डॉक्टर राहुल चौधरी यांचे मत आहे. अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळाली आहे. “आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या ग्रंथी असतात. त्यांवर तेलाचा एक थर असतो. जेव्हा आपण डोळ्यांवर पाणी मारतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या थरावर होत असतो. परिणामी तुमच्या डोळ्यांना कोरडेपणा येतो. डोळ्यांमधील अनावश्यक गोष्टी / कचरा बाहेर काढण्यासाठी डोळ्यांमध्ये नैसर्गिक यंत्रणा असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे”, अशी माहिती डॉक्टर राहुल चौधरी यांनी यूट्युब पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया यांच्याशी झालेल्या संभाषणात सांगितली.

पंचशील पार्कच्या मॅक्स मल्टी स्पेशालिटी सेंटरमधील नेत्ररोगशास्त्रज्ञ व प्रमुख सल्लागार डॉक्टर दीपाली गर्ग माथूर यांनीही डॉक्टर राहुल यांच्या मताशी सहमती दर्शविली आहे. तसेच, आपले डोळे हे नैसर्गिकरीत्या अश्रूंनी स्वच्छ होतात, असे त्या म्हणतात. “डोळ्यांमध्ये गेलेला कोणताही कचरा बाहेर काढण्यासाठी, तसेच डोळ्यांना वंगण म्हणून अश्रू काम करतात. इतकेच नव्हे, तर कोणत्याही संसर्गांपासूनही आपल्या डोळ्यांचा बचाव केला जातो,” असे डॉक्टर माथूर म्हणतात

हेही वाचा : मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…

अश्रूंमध्ये [Tear fluid] लाइसोझाइम, लैक्टोफेरिन, लिपोकॅलिन, लैक्टोफेरिन, इम्युनोग्लोबुलिन, ग्लुकोज, युरिया, सोडियम व पोटॅशियम या घटकांसह पाण्याचा थर, म्युसिन थर व लिपिड्स असे तीन थर नैसर्गिकरीत्या असतात. “आपल्या अश्रूंमध्ये अनेक असे घटक असतात; जे आपल्या डोळ्यांचे इतर जीवजंतूंपासून रक्षण करण्यास मदत करतात,” असे डॉक्टर माथूर म्हणतात.

त्यामुळे झोपून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारून आरामदायी आणि ताजेतवाने जरी वाटत असेल तरीही असे करणे चुकीचे आणि डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. आपल्या डोळ्यांची नाजूक रचना, कॉर्निया व नेत्रश्लेष्मला [conjunctiva] यांना आपण ज्या घटकांच्या संपर्कात आणतो, त्यांसाठी आपले डोळे संवेदनशील असतात, अशी माहिती कुकटपल्ली येथील मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ कॉर्निया व रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉक्टर माधवी मॅजेटी यांनी दिली.

डॉक्टर माधवी यांच्या मते, आपण जे पाणी वापरतो ते पाणी अशुद्ध असून, त्यामध्ये अनेक जीव-जीवाणू असू शकतात; ज्यांमुळे आपल्या डोळ्यांना धोका होऊ शकतो. “नळाच्या पाण्याचा तुम्ही थेट डोळ्यांवर वापर केल्यास अशुद्ध पाण्यामुळे डोळ्यांना जळजळ, संसर्ग किंवा इतर त्रासदायक संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात. इतकेच नव्हे, तर ज्या टीयर फिल्म [tear film] मुळे डोळ्यांच्या पृष्ठभागाची काळजी आणि दृष्टीची स्पष्टता राखण्यास मदत मिळते, त्या टीयर फिल्ममध्ये डोळ्यांवर मारल्या जाणाऱ्या पाण्याच्या हबक्याच्या तीव्रतेमुळे व्यत्यय येऊ शकतो,” असेही डॉक्टर माधवी म्हणतात.

हेही वाचा : द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

यावर उपाय काय?

डोळ्यांवर भराभर आणि जोरात पाणी मारण्यापेक्षा सौम्य पद्धतीचा वापर करावा, असे डॉक्टर माधवी सांगतात. “थेट डोळ्यांवर पाणी मारण्याऐवजी एखाद्या ओल्या स्वच्छ फडक्याने डोळ्यांभोवतीचा भाग पुसून घ्या. तसेच रात्रभर झोपल्याने डोळ्यांतून पाणी आले असल्यास किंवा इतर स्राव स्वच्छ करून घ्यावा. तसेच तुम्ही जर कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करीत असाल, तर तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांनी सुचविलेल्या योग्य त्या स्वच्छता पद्धतींचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे,” असेही त्या म्हणतात.

ज्यांना उठल्यानंतर डोळ्यांसाठी ‘रिफ्रेशिंग’ रुटीन हवे असेल, त्यांनी प्रिझर्व्हेटिव्ह-मुक्त कृत्रिम टीअर्सचा वापर करावा. अथवा विशेषतः डोळ्यांच्या स्वच्छतेसाठी तयार केल्या गेलेल्या सौम्य आय वॉश सोल्युशनचा वापर करावा. अशी उत्पादने डोळ्यांना कोणतीही इजा न पोहोचवता ओलावा देण्यासाठी आणि त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करू शकतात, असाही सल्ला डॉक्टर माधवी यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे हेदेखील तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी, तसेच डोळ्यांना कोणत्याही त्रासाचे लवकर निदान करण्यासाठी फायदेशीर ठरते. “तुमचे डोळ्यांचे डॉक्टर तुमच्या वैयक्तिक गरजा आणि डोळ्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या स्वच्छतेवर, तसेच स्वच्छतेच्या पद्धतींवर वैयक्तिक मार्गदर्शन देऊ शकतात,” असा सल्ला डॉक्टर माधवी मॅजेटी यांनी दिला आहे.