डॉ. रश्मी जोशी शेट्टी

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या बातम्या हादरून टाकणाऱ्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलेली दृश्ये हेलावणारी आहेत. अकस्मात झालेल्या हल्ल्यांमध्ये धारातिर्थी पडणारे नागरिक, भल्यामोठ्या इमारती मिसाइलच्या एका तडाख्यात जमिनदोस्त होतानाची दृश्ये, लहान निरागस मुलांना जीवे मारून जाळल्याचे व्हिडीओ, जनसामान्यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश हे सगळे मानवतेला काळीमा फासणारे तर आहेच पण या शिवाय या सर्व घटनांचे दूरगामी परिणाम मनावर होणारे आहेत.

कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा किंवा आघात होऊन किंवा कुठून तरी अशा आघातांच ज्ञान झाल्यानंतर जी मानसिक लक्षणं निर्माण होतात त्याला पोस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असे म्हणतात. ही आपत्ती नैसर्गिक (भूकंप, त्सुनामी असो वा प्रेमाच्या माणसाला अचानक गमावणे असो) असो किंवा मानवी कृत्ये (जातीय दंगली, गर्दी किंवा अचानक धोक्याची सूचना आल्यावर होणारी चेंगराचेंगरी, बलात्कार आदी) अशा घटनांमध्ये ही लक्षणे पाहायला मिळतात. मन तर मनंच असतं, त्यावर होणारे आघात खोलवर अंतर्मनात जाऊन बसतात.

हेही वाचा : कानाच्या पाळीवरील ‘ही’ खूण असते हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकाराचं चिन्ह? हृदयरोग तज्ज्ञांनी दिली स्पष्ट माहिती

“कोविड महासाथीनंतर आयसीयूतून बाहेर आलेले आपल्या वडिलांचे शव आणतांना इतर अनेक मृतदेह पाहिले आणि आता अगदी रात्रीसुद्धा मला तशीच स्वप्ने येतात आणि दचकून जाग येऊन मी सैरभैर घरात पळतो” असं क्लिनिकमध्ये आलेल्या एका विकारग्रस्तानं सांगितलं, हे PTSD चंच लक्षण आहे. ही लक्षणे अशा विद्ध्वंसक घटनेनंतर लगेचच किंवा एक ते दोन आठवड्यात सुरू होतात आणि एक ते सहा महिने किंवा त्यापेक्षा ही जास्त काळ राहू शकतात. अशा घटनांनंतर १०० पैकी ७-८ जणांना PTSD चा अनुभव येतो. या आजारात भावनांबरोबर त्या प्रसंगाची काही चित्रं डोक्यात कैद होतात ती एक इमेजरी मनात कायम राहाते आणि त्याची अनैच्छिक आठवण तयार होते, त्याची वाईट स्वप्नेही पडतात. त्याला फ्लॅशबॅक म्हणतात.

अनियंत्रित कंप, थंडी वाजणे, भिती वाटणे, डोकेदुखी अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. काहींना त्या घटनांबद्दल ऐकलं तरी त्रास होतो आणि त्यासाठी ते अशा गोष्टी किंवा जागा टाळतात ज्यामुळे त्यांना त्या प्रसंगाची आठवण होईल. अतिसतर्कता आणि उत्तेजना म्हणजे खूप पटकन दचकणे, शांत झोप न येणे, चिडचिडेपणा, तीव्र राग येणे, एकाग्रता कमी होणे ही लक्षणे यात दिसतात. भावनिकदृष्टया खचल्याने सुख किंवा दुःखाच्या क्षणी त्या भावना इतरांसारख्या त्यांना अनुभवणे कठिण जाते. आधी ज्या गोष्टीत रस वाटायचा तो कमी होतो. काही घटनेनंतर आठवड्यात हळूहळू सावरायला लागतात पण काहींना महिने किंवा वर्षेही लागतात. त्यातच पॅनिक अॅटॅक, उदासिनता, आत्महत्येचे विचार येणे, मादक पदार्थांच्या सेवनाची इच्छा अशीही लक्षणे येऊन रोजच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात. PTSD चे वेळेत निदान आणि उपचार होणे अतिशय आवश्यक आहे.

हेही वाचा : Health Special: व्हिटामिन्समधून शरीराला ऊर्जा मिळते; समज की, गैरसमज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबीय आणि मित्रांची मदत अशावेळी अतिशय महत्वाची ठरते. ग्रुप थेरपी जिथे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लोक आपले अनुभव, भावना आणि समस्या व्यक्त करतात तेही चांगले आहे. कोणी अशा त्रासातून जात असेल तर त्याच्याबरोबर राहून धीर देणे, आता ती परिस्थिती संपली आहे याची हळूवारपणे जाणीव करून देणे, त्रासातील व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांना पूर्ववत आयुष्य नव्याने सुरू होण्यास मदत करणे आवश्यक आहे. अध्यात्मिक गोष्टींनी अशावेळी मन हलके होते. एकत्रित योग, प्राणायाम, प्रार्थना करणे चांगले ठरते. तरीही आजाराची लक्षणे दिसल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.