चाळिसाव्या वर्षांनंतर स्नायूमधील तंतूंमध्ये दुर्बल्य येण्यास सुरुवात होते. साहजिकच त्यामुळे स्नायू कमकुवत होणे, वेदना होणे, लहानशा धक्क्यानेही पडणे, चालताना तोल जाणे ही लक्षणे अगदी सामान्यपणे दिसतात. हाडांची घनता कमी झाल्याने ती ठिसूळ होतात आणि छोटय़ाशा अपघातानेही हाडांना फॅक्चर होण्याची शक्यता वाढते. योग्य आहार व व्यायामाने हा धोका मोठय़ा प्रमाणात कमी करता येतो किंवा त्याची तीव्रता कमी होते. वयानुरूप हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे हाडांच्या दुखण्यात भर पडते आणि त्यावर आधुनिक औषधांनी उपचार करता येतो.
वयाच्या पन्नाशीनंतर स्नायू व सांध्यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे आजार संभवतात.
मृदू उतींचे सर्वसामान्य आजारवयाच्या पन्नाशीनंतर स्नायू व सांध्यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे आजार संभवतात
फायब्रोमायलजिआ- दीर्घकाळीन वेदना, स्नायुदुखी, हाडांची ताठरता, सांधेदुखी ही या आजाराची लक्षणे. या आजारामुळे ऊनद्रानाश होणे, अस्वस्थता वाढणे, नैराश्य येणे असे परिणामही दिसतात.
फ्रोझन शोल्डर- या दुखण्यात स्नायू ताठर होतात व वेदना हळूहळू वाढण्यास सुरुवात होते, त्यामुळे सांध्याच्या हालचालींवर मर्यादा येतात. हे दुखणे बरे होण्यासाठी एक ते दोन वर्षे लागतात.
प्लॅण्डर फॅसिओटिस- पन्नासाव्या वर्षांनंतर हा त्रास अनेकांना होतो. टाच आणि तळव्यांच्या बाजूला वेदना होतात. आंघोळ, कपडे बदलणे अवघड होते. पलंगावरून उठणे, शौचालय वापरणेही समस्या होतात.
मृदू उतींचा संधिवात (रुमॅटिझम)- स्नायू, सांध्यांना जोडणाऱ्या उती, हाडे व स्नायू यांच्यातील उती यामध्ये वेदना सुरू होतात. काही वेळा या भागातील नसांमध्येही दुखते तर काही वेळा हे दुखणे शरीरातील एकाच भागापुरते मर्यादित राहत नाही.
सांधे व हाडांमधील आजार
अस्थिसंधिवात (ऑस्टीओआर्थायटिस )- सामान्यपणे सांध्याकडे हाडे एकमेकांशी थेट जोडलेली नसतात. दोन्ही हाडांवर असलेल्या उतींच्या जाड थरामुळे सांध्याची हालचाल सुकर होते. पण वयानुरूप हा थर कमी होत जाऊन पूर्ण नष्ट होतो. पेशींची ही गादी नाहीशी झाल्याने हाडे एकमेकांवर घासली जातात आणि त्यामुळे प्रचंड कळा उठतात. त्यामुळे सांध्याची हालचालीवर मर्यादा येते. ही अस्थिसंधिवाताची अगदी सामान्य वैशिष्टय़े आहेत. हाडांमध्ये कोपर किंवा मनगटाकडे समस्या उद्भवतात. पायात गुडघे, मांडय़ांवर परिणाम होतो. बसताना किंवा खुर्चीवरून उठत असताना त्रास होतो, ट्रेनमधून चढणे-उतरणे अशक्य होते आणि चालणेही अनेकदा तापदायक ठरते. हा थर जाऊन हाडे एकमेकांना जोडली गेली की सांध्यांच्या हालचाली पूर्ण थंडावतात.
संधिवात (रुमॅटोइड आथ्रायटिस)- वृद्धांच्या स्नायूदुखीमधील दुसऱ्या क्रमांकाचा आजार. हा ३० ते ४०व्या वर्षी सुरू होऊन वयानुसार वाढत जातो. बोटांची हाडे, मनगट, कोपर, ढोपर, घोटा यांमध्ये वेदना होतात. सांध्यांमध्ये दुखणे, त्वचा लाल होणे, सूज येणे यामुळे रोजची दैनंदिन कामे करणेही त्रासदायक होते.
संधीवायू (गाऊट)- वय वाढल्यावर व अनेकदा मासिक पाळी थांबल्यावर स्त्रियांमध्ये पायाच्या अंगठय़ाच्या हाडाला सूज येते. त्वचा लाल दिसते आणि मूत्रावाटे खडे जातात. पन्नास टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसतात. इतर मोठय़ा सांध्यांनाही सूज येऊ शकते. उपचारांनी हे बरे होऊ शकते. मात्र योग्य आहार घेतला नाही तर पुन:पुन्हा वेदनांचे आघात होऊ शकतात. उच्च प्युरीनयुक्त पदार्थ कमी करणे हा त्यावरचा एक प्रतिबंधात्मक उपाय. फळांच्या बिया, मटण, पालकाची भाजी टाळणे आणि सांध्यांना पूर्ण आराम देणे आवश्यक असते. वृद्धापकाळात याशिवायही अनेक सांधेदुखीचे प्रकार होतात. त्यासाठी स्वयंउपचार सोडून डॉक्टरांची वेळीच मदत घ्यावी.
अस्थिठिसुळता (ओस्टिओपोरॅसिस) – हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यावर हा आजार होतो. हाडे अगदी ठिसूळ होतात व त्यामुळे पडल्यावर ती मोडण्याचा, फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. हाडांमधील कॅल्शिअम हे वर्षांनुवर्षे बँकेत जमा केलेल्या पैशांप्रमाणे असते. तरुणवयात कॅल्शिअमयुक्त पदार्थाचा आहारात वापर, थायरॉइड तसेच वाढीसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स आणि व्यायाम यामुळे अस्थिठिसुळतेचा धोका पुढे ढकलता येतो. योग्य व्यायाम, कॅल्शिअम सप्लिमेंट्स आणि ड जीवनसत्त्व यांमुळे वृद्धापकाळात हा आजार व त्यातील गुंतागुत कमी करता येते.
उपचार- भराभर चालणे, पळणे, पोहणे, सायकल चालवणे, कथकली-मणीपुरी- भरतनाटय़मसारखे नृत्य यांमुळे सांध्यांची क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे शरीराचे वजन पेलण्यास, सांध्यांची हालचाल सुकर होण्यास तसेच तोल सांभाळण्याची हाडांची शक्ती वाढते. खूप त्रास होत असलेल्या सांध्यांना फिजिओथेरपीची मदत घेता येते. वेदना होत असलेल्या ठिकाणी गरम पाण्याचा शेक दिल्याने सूज उतरते.
सकाळी सात ते आठदरम्यान सूर्यप्रकाशात ३० ते ४० मिनिटे व्यायाम केल्यास त्वचेमध्ये ड जीवनसत्त्व तयार होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घेता येतील.
आहार- भारतीय जेवण उत्तम पण खूप तेलकट, भरपूर कॅलरी असलेले पदार्थ टाळावेत. साधारण २०२० किलोकॅलरी जेवण दिवसभरात पुरेसे होते. दूध, ताक, हिरव्या भाज्या, कडधान्ये, मासे, अंडय़ाचा पांढरा भाग असे कॅल्शिअमयुक्त पदार्थ आहारात घ्यावेत. तुम्ही लठ्ठ असाल तर बॉडी मास इंडेक्स कमी करण्याचा प्रयत्न करा. कंबरेचा घेर ९० सेंटीमीटरपेक्षा कमी असावा. सकाळी सहा ते रात्री ९ पर्यंत चार ते पाच टप्प्यात खावे. जेवल्यानंतर दोन तासांनी झोपावे. काही समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांची मदत घ्या. स्वत:हून औषधे घेणे टाळा, ते धोकादायक असते.